मोठय़ा कंपन्यांना मिळणार लाभ : नवे नियम होणार लागू
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बाजारातील नियामक सेबीने इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. सेबीने म्हटले आहे, की ज्या कंपन्यांचे बाजारमूल्य एक लाख कोटी रुपये राहणार आहे, त्यांना सध्या आयपीओमध्ये 10 टक्क्यांऐवजी कमीत कमी 5 टक्क्यांची हिस्सेदारी विकता येणार आहे. विशेष बाब म्हणजे हा बदल भारतीय आयुर्विमा महामंडळ(एलआयसी) आयपीओच्या अगोदरच लागू केला आहे.
नवीन नियमानुसार प्रमोटरची हिस्सेदारी 75 टक्क्यांवर आणण्यासाठी कमीत कमी पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. या अगोदर ही स्थिती तीन वर्षांची होती. पब्लिकची हिस्सेदारी 25 टक्क्यांवर आणण्यासाठी हा नियम असणार आहे. या व्यतिरिक्त कंपनीचे बाजारमूल्य आयपीओनंतर दोन लाख कोटी रुपयांवर पोहचल्यास 10 टक्क्यांऐवजी 7.5 टक्क्यांची हिस्सेदारी विकावी लागणार आहे.
बैठकीला अर्थमंत्र्यांची उपस्थिती
सेबीने बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला पेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांची उपस्थिती होती. यावेळी सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी हे उपस्थित होते.