प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे होताहेत हाल : खासगी वाहनांची चंगळ
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा मागील आठवडय़ाभरापासून ठप्प झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. महाराष्ट्राची लालपरी मागील सहा महिन्यांपासून कर्नाटकात धावली नाही. तर कर्नाटकच्या काही मोजक्मया बसेस महाराष्ट्रात धावत होत्या. मात्र आता त्याही बंद झाल्याने कर्नाटक-महाराष्ट्र असा प्रवास करणाऱया प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
बेळगाव जिल्हय़ातील सीमाहद्दीवरील प्रवाशांना कर्नाटक-महाराष्ट्र ही आंतरराज्य बससेवा वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून ही आंतरराज्य सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांबरोबर विद्यार्थ्यांची हेळसांड होताना दिसत आहे. सीमाहद्दीवरील विद्यार्थी शिक्षणासाठी बेळगाव आणि कोल्हापूरला जात असतात. मात्र दोन्ही राज्यांची बससेवा ठप्प झाल्याने खासगी वाहनांवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे दररोज विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
कोरोनापूर्वी बेळगाव बसस्थानकातून 350 हून अधिक बसेस महाराष्ट्राच्या विविध शहरांकडे धावत होत्या. त्यामुळे बेळगाव विभागाला चांगला महसूल उपलब्ध व्हायचा. याबरोबरच कोल्हापूर बसस्थानकातून बेळगाव, चिकोडी, निपाणी, संकेश्वर, हुक्केरी आदी ठिकाणी लालपरी धावत होती. मात्र आता दोन्ही राज्यांची बससेवा ठप्प झाल्याने महसुलावरही परिणाम झाला आहे. विशेषकरून बेळगाव विभागाच्या महसुलावर मोठा परिणाम झाला आहे.
खासगी वाहनांना अच्छे दिन
कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांची खासगी वाहनांद्वारेच वाहतूक सुरू आहे. बससेवा ठप्प झाल्याने सीमाहद्दीवरील खासगी वाहनांना अच्छे दिन आले आहेत. आंतरराज्य बससेवा ठप्प झाल्याचा फायदा घेत काही खासगी वाहनधारक प्रवाशांकडून अधिक तिकीट भाडे घेत आहेत. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. बससेवा बंद असल्याने काही ठिकाणी दुप्पट तिकीट आकारणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील संप संपताच बससेवा सुरळीत
विविध मागण्यांसाठी महाराष्ट्राच्या एसटी कर्मचाऱयांनी संप पुकारला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या बसदेखील थांबल्या आहेत. कर्नाटकने सीमाहद्दीवरील आरटीपीसीआरमध्ये शिथिलता दिली आहे. मात्र महाराष्ट्रात संप सुरू असल्याने दोन्ही राज्यांची बससेवा कोलमडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱयांचा संप संपताच दोन्ही राज्यांची बससेवा सुरळीत सुरू होण्याची शक्यता आहे.
लवकरच बससेवा महाराष्ट्राच्या विविध शहरांकडे धावेल
कर्नाटक सीमेवरील आरटीपीसीआरमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची लालपरी कर्नाटकात धावू शकते. मात्र महाराष्ट्रातच संप सुरू असल्याने दोन्ही राज्यांची बससेवा ठप्प झाली आहे. संप मागे घेताच कर्नाटकची बससेवा महाराष्ट्राच्या विविध शहरांकडे धावेल आणि कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा सुरळीत सुरू होईल.
-के. के. लमाणी (विभागीय संचार अधिकारी-केएसआरटीसी)