भारतीय हवामान खात्याकडून आकडेवारी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात खराब हवामानाशी संबंधित घटनांमुळे प्रतिदिन सरासरी 8 जणांचा मृत्यू होत आहे. यातील सर्वाधिक मृत्यू अतिवृष्टीमुळे उद्भवलेली स्थिती, वीज कोसळणे, वादळी पाऊस, थंडीची लाट आणि धूळयुक्त पावसामुळे झाले आहेत. भारतीय हवामान विभागाकडून संकलित हवामानाशी संबंधित प्रतिकूल घटनांमुळे 2010-2021 या कालावधीत झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.
प्रतिकूल हवामान घटनांमुळे मागील साडे अकरा वर्षांच्या कालावधीत 32,043 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे प्रतिदिन सरासरी 8 जणांचा मृत्यू होत असल्याचे म्हटले गेले आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून प्रकाशित हवामान बदलाशी संबंधित नव्या अहवालात विसाव्या शतकाच्या मध्यापासून भारतात सरासरी तापमानात वृद्धी दिसून आल्याचे, मान्सून पर्जन्यमानात घट झाल्याचे, दुष्काळ आणि समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याचे म्हटले गेले आहे.
भीषण चक्रीवादळाच्या तीव्रतेत वृद्धी झाली असून क्षेत्रीय हवामानात या बदलांमागे मानवी हालचाली कारणीभूत असल्याचे वैज्ञानिक पुरावे आढळले आहेत. 21 व्या शतकात देखील मानव प्रेरित हवामान बदल याच वेगाने सुरू राहण्याची शक्यता असल्याचे म्हटले गेले आहे.
अतिवृष्टीचे बळी
हवामान विभागाकडून संकलित आकडेवारीनुसार अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे 2010 ते 2021 च्या मध्यापर्यंत 13,303 लोकांचा मृत्यू झाला. तर उष्माघातामुळे 6,495 आणि थंडीच्या लाटेमुळे 2,489 जणांचा मृत्यू झाला. वादळी पावसामुळे याच कालावधीत 3,832 जणांना जीव गमवावा लागला. तर चक्रीवादळामुळे याच कालावधीत 895, धूळयुक्त वादळामुळे 446 तर हिमवृष्टीमुळे 345 जणांचा मृत्यू झाला आहे.
हवामान बदल
1901 ते 2018 दरम्यान भारताच्या सरासरी तापमानात सुमारे 0.7 अंश सेल्सिअसची वृद्धी झाली आहे. अलिकडच्या 30 वर्षांच्या कालावधीदरम्यान (1986 ते 2015) दरम्यान वर्षातील सर्वात उष्ण दिवस आणि सर्वात थंड रात्रीच्या तापमानात अनुक्रमे 0.63 अंश सेल्सिअस तसेच 0.4 अंश सेल्सिअसची वाढ झाल्याचे हवामान बदलावरील मूल्यांकन अहवालात नमूद आहे.
सरासरी तापमानात वृद्धी
पृष्ठभागावरील तापमान आणि आर्द्रतेत संयुक्त वृद्धीमुळे पूर्ण भारत आणि विशेषकरून गंगा तसेच सिंधू खोरे क्षेत्रात उष्माघात वाढविण्याची शक्यता आहे. 1951 ते 2015 दरम्यान उष्णकटिबंधीय हिंदी महासागराचा पृष्ठभाग तापमानात सरासरी एक अंश सेल्सिअसची वृद्धी झाली आहे. मागील 6 ते 7 दशकांदरम्यान भारतात दुष्काळ पडण्याच्या घटनांमध्ये वाढ दिसून आली आहे.