आमदार सुदिन ढवळीकर यांची पत्रकार परिषदेतून मागणी
वार्ताहर / मडकई
लोकशाही टिकवायची असल्यास लोकं जीवंत असणे आवश्यक आहे. जनताच जर फैलावणाऱया कोवीडच्या संसर्गामुळे अशी मृत्यूमुखी पडत असेल तर सरकार अस्थित्त्वात असून त्याचा फायदा तो काय. आणि आर्थिक घसरण होईल म्हणून लॉकडाऊनची टाळाटाळ करून जनतेच्या जीवाशी खेळणे हे उचित नव्हे. जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे सरकार व प्रत्येक लोकप्रतिनीधींचे कर्तव्य आहे. पंधरा दिवसांकरीता गरिब घटकांसाठी मोफत रेशन व अन्य खाण्यापिण्याचे साहित्य पुरवून सरकारने त्वरीत लॉकडाऊन करावे अशी मागणी मगो नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी तळावलीत पत्रकार परिषदेतून केली आहे.
गेले कित्येक दिवस कर्फ्यू लावण्यासाठी प्रसिध्दी माध्यमातून मी अक्षरशः ओरड करतोय, पण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याकडे कानाडोळा करीत आहे. आर्थिक घसरणीचा मुद्दा पूढे करून लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचे सांगतात. जनतेच्या जीवाला किमंत द्या, आर्थिक गोष्टीला महत्त्व देऊ नका. कर्फ्यु अथवा लॉकडाऊनसाठी आपण सातत्याने मागणी केली. पण जेव्हा वेळ निघून जावू लागली, तेव्हा त्यांना कर्फ्यूची आठवण झाली. पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनसाठी आपण गेले कित्येक दिवस मागणी करीत आहे. पण सरकार ऐकून घेत नाही. गोव्यात कोरोनाने घातलेला थैमान पाहून डोकंच बधीर होण्याची वेळ आलेली आहे. एकटा आपण व पंचसदस्य काम करीत आहे पण म्हणून कोरोनाचा संसर्ग कमी होणार नाही. म्हणून आपण भाजपाचे अध्यक्ष श्री. तानावडे यांना कोरोनाच्या फैलावत जाणाऱया संसर्गाला थोपवून धरण्यासाठी तुम्ही तरी मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना समजून लॉकडाऊन करण्यास सांगा, अशी मागणी केलेली असल्याचे आमदार श्री. ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले.
व्हेंटीलेटर मुबलक प्रमाणात आणावे अशी आपण गेले वर्षभर मागणी करीत आहे. पण सरकारला व्हेटींलेटर आणण्यास अपयश आलेले आहे. विद्यमानस्थीतीत या व्हेंटीलेटरचीच कमतरता भासत आहे. फक्त आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचा अपवाद वगळल्यास अन्य मंत्री व मुख्यमंत्री नरो वा कुंजरोची भुमीका घेताना दिसत आहे. काही आमदार तोबा गर्दी करून वाढदिवस साजरे करतात. तर एक मंत्री घरच्या लग्न समारंभात गर्दीत नाचून दाखवितात. हा वायरल झालेला व्हिडीओ पाहून मान शरमेने खाली जावू लागते. आपला विरोध नाचण्याला नाही. संसर्ग फैलावत असल्यामुळे हेच मंत्री दुसऱयांना मार्गदर्शक तत्त्वे पाळण्याचे आवाहन करतात मात्र स्वतः याच नियमांची पायमल्ली करून गर्दीत नाचण्याचा आसुरी आनंद घेतात. हे योग्य नाही. सरकारचे नियम सरकारच धाब्यावर बसवीत आहे, तर जनतेने कुणाच्या तेंडाकडे पाहावे, असा सवाल करून त्यांनी पुढे सांगितले की, गोवा अशा दुःखाच्या छायेखाली जात असताना मंत्र्याना डान्स करणे अथवा वाढदिवस साजरा करण्याचे सुचतेच कसे.
1 लाख 85 हजार घरांना अन्न, पाण्याची सोय करून त्वरीत सरकारने पंधरा दिवसांचे लॉकडाऊन करावे. अशी आपली सरकारकडे मागणी असल्याचे आमदार श्री. ढवळीकर यांनी सांगितले. नवीन प्रकल्प उभारण्याची सद्या तरी आवश्यकता नाही. या प्रकल्पाचा निधी कोवीडसाठी वापरा जनतेच्या आरोग्याची काळजी घ्या जूने असलेलेच सर्व प्रकल्प पूर्ण करा. मंत्र्याकडे अतिरीक्त असलेल्या कर्मचाऱयांचा भरणा कमी करा. कुठल्याही कामासाठी अवाढव्य खर्च न करता त्याचा वापर जनतेकरीता कसा होईल यावर विचारविनीमय करण्याची आवश्यकता आहे, असे आमदार श्री. ढवळीकर यांनी सांगितले.