रत्नागिरी / प्रतिनिधी
रत्नागिरी जिह्यात येणाऱया चाकरमानी व बाहेरगावहून येणाऱया व्यक्तींना क्वारंटाईन करण्यासाठीची सिद्धता प्रशासनाने केली आहे. सुमारे 850 ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील शाळा, समाज मंदिरे त्यासाठी ताब्यात घेण्यात येणार आहेत. जिल्हय़ात अशी 12 हजार 300 ठिकाणे निश्चित करण्यात आली असून 74 हजार लोकांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी मनिषा देसाई यांनी ही माहिती दिली. रत्नागिरी जिह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज, समाज मंदिर, मंगल कार्यालय, खासगी हॉटेल्सची सभागृहे बचत गटांच्या शेड या ठिकाणी बाहेर गावाहून आलेल्या लोकांना क्वॉरंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी पाणी, स्वच्छतागृह यांची व्यवस्था देखील चांगल्या स्वरूपात आहे. या ठिकाणी लोकांना शासकीय स्तरावरून क्वॉरंटाईन काळात भोजन पुरवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे त्यासाठी रक्कम अदा करण्यात येईल. स्थानिक पातळीवर बचत गट किंवा अन्य सेवा पुरवठादार यांच्याकडून ही सेवा उपलब्ध करून घेता येईल.
सर्व ठिकाणच्या ग्रामपंचायती क्षेत्रामध्ये क्वॉरंटाईनची व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली आहे. जशी गरज भासेल त्याप्रमाणे त्या त्या वस्तीस्थानांचा उपयोग बाहेरून आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यासाठी केला जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
शहरी क्षेत्रात राजापूरमध्ये दोन ठिकाणी 42 लोकांची, रत्नागिरीत 66 ठिकाणी 2605, चिपळुणात 46 ठिकाणी 1313, खेडमधये 8 ठिकाणी 291, दापोलीत 2 ठिकाणी 122, गुहागरात 25 ठिकाणी 400, देवरूखमध्ये 6 ठिकाणी 189, लांजात 13 ठिकाणी 120, मंडणगडात 2 ठिकाणी 142 लोकांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्ह्य़ात शहरी भागातील 170 ठिकाणी 5224 लोकांची व्यवस्था नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आली आहे.