1,115 जणांचा मृत्यू, देशात कोरोनाबाधितांनी ओलांडला 43 लाखांचा टप्पा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्या देशात कोरोना विषाणूचे थैमान पाहायला मिळत आहे. दिवसागणित रुग्णसंख्येत मोठी भर पडत आहे. देशात कोरोना संसर्गाचा उदेक होत असल्याने बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता 43 लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. मागील चोवीस तासांमध्ये देशभरात तब्बल 89 हजार 706 नवे बाधित आढळले असून, 1 हजार 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 43 लाख 70 हजार 129 वर पोहोचली आहे. देशभरातील 43 लाख 70 हजार 129 कोरोनाबाधितांमध्ये 8 लाख 97 हजार 394 सक्रीय रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले 33 लाख 98 हजार 844 जण व आतापर्यंत मृत्यू झालेले 73 हजार 890 जणांच्या संख्येचा समावेश आहे.
देशभरात 8 सप्टेंबरपर्यंत 5 कोटी 18 लाख 04 हजार 677 नमुने तपासण्यात आले आहेत. यातील 11 लाख 54 हजार 549 नमुन्यांची मंगळवारी एका दिवसात तपासणी झाल्याचे आयसीएमआरकडून बुधवारी सांगण्यात आले.
60 टक्के कोरोनाबाधित केवळ पाच राज्यांमध्ये
दरम्यान, देशातील 60 टक्के कोरोनाबाधित केवळ 5 राज्यांमध्ये आहेत. तर मागील 24 तासांत भर पडलेल्या 89,706 नव्या रुग्णांमध्ये महाराष्ट्र, आंध्रप्रदेश राज्य अव्वल स्थानी आहेत. या नव्या रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील 20,000 हून अधिक रुग्ण तर आंध्रप्रदेशातील 10,000 हून अधिक रुग्णांची भर पडली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तेव्हापासूनच कोरोनाग्रस्तांच्या संख्येत महाराष्ट्र प्रथमस्थानी आहे. त्या पाठोपाठ कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू या राज्यांचा क्रमांक लागतो. देशातील कोरोना बाधितांचा आकडा मोठय़ा प्रमाणावर वाढत असला तरी कोरोनामुक्त होणाऱयांची संख्याही चांगली आहे. त्यामुळे कोविड-19 चा रिकव्हरी रेट सुधारत असून मृत्यूदरात घट होत आहे.