नियुक्तीपासून निवृत्तीपर्यंत एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाऱयात चलबिचल
प्रतिनिधी/ पणजी
नियुक्ती पासून निवृत्तीपर्यंत एकाच ठिकाणी काम करणाऱया पंचायत कर्मचाऱयांनाही यापुढे बदली प्रक्रियेतून जावे लागणार असून त्या प्रक्रियेची अंमलबजावणी आज दि. 1 जानेवारी पासून सुरू होणार आहे. सर्व ग्रामपंचायतींना समान वर्गवारीत आणण्यासाठी गोवा पंचायत कर्मचारी भरती वेतन नियमात दुरुस्ती करून दि. 5 मार्च 2019 रोजी आदेश जारी केला होता. त्याची अमंलबजावणी करण्यास आता सरकारने मंजुरी दिली आहे. समान वर्गवारीत आल्यामुळे या कर्मचाऱयांना पगारवाढ, आरोग्यभत्ते, महिला कर्मचाऱयांना पालकत्व रजा यासारख्या अनेक सुविधा मिळणार आहेत.
राज्यात एकूण 191 ग्रामपंचायती असून तेथे अंदाजे 600 कर्मचारी काम करतात. या सर्वांना आता बदली प्रक्रियेस सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्या बदलीचे अधिकार पंचायत संचालकांकडे राहणार असून त्यासंबंधी सूचनापत्र जारी करण्यात आले आहे. राज्यात 5 ते 11 सदस्य असलेल्या ग्रामपंचायती आहेत. त्यांच्या सदस्यसंख्येनुसार तेथे कर्मचारी भरतीची तजवीज असते. त्यानुसार 5 व 7 सदस्य असलेल्या पंचायतींसाठी एक कारकून, 9 सदस्यांच्या पंचायतींसाठी 2 तर 11 सदस्यीय पंचायतींसाठी 3 कारकून नियुक्त करता येतात. तसेच प्यून, चालक, ग्रंथपाल यासारख्या अन्य पदांवरही कर्मचारी भरती करण्यात आलेली असते.
त्याशिवाय कंत्राटी पद्धतीवरही अनेक कर्मचाऱयांची भरती करण्यात येते. मात्र ते बदली नियमात बसणार नाही. पंचायत खात्याच्या मान्यतेनुसार नियुक्ती झालेल्या कर्मचाऱयांचीच बदली होणार आहे. बहुतेक पंचायतीत तीन ते चार कर्मचारी असतात. तर काही बडय़ा पंचायतीत 25 ते 30 पर्यंत सुद्धा कर्मचारी असतात. हे कर्मचारी कंत्राटी असतात.
पंचायत संचालकांना कर्मचाऱयांची बदली करण्याचे अधिकार असले तरीही विशेष आदेश काढून संचालक स्वतःकडील काही अधिकार गट विकास अधिकाऱयांकडे देऊ शकतात. तसेच पंचायत संचालकांनी जारी केलेल्या बदली आदेशाचे पालन करणे सर्व पंचायती आणि कर्मचाऱयांना बंधनकारक राहणार आहे.
या बदल्या संबंधित बीडीओच्या कार्यकक्षेतील एखाद्या पंचायतीत किंवा आवश्यकतेनुसार अन्य पंचायतीत करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे बदलीचा आदेश जारी झालेल्या कर्मचाऱयास संबंधित पंचायतीच्या सचिवाने तेथील जबाबदारीतून त्वरित मुक्त करावे, असे संचालकांनी सूचनापत्रात म्हटले आहे. सदर कर्मचाऱयास जबाबदारीतून मुक्त करताना सचिवाने त्याच्या तेथील वेतनाची पावती तसेच शेवटच्या महिन्यात मिळालेले वेतन आणि भत्ते यासंबंधीचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. त्यानुसार त्या कर्मचाऱयास बदलीवर रुजू झालेल्या नव्या पंचायतीत वेतन देण्यात येणार आहे.
2019 मध्ये सदर आदेश जारी करण्यात आला होता. त्यानंतर प्रत्येक पंचायतीतील कर्मचारी आणि त्यांना मिळणारे वेतन यांची माहिती संकलित करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे या आदेशाची प्रत्यक्ष अमंलबजावणी होण्यास 2021 उजाडावे लागले व आज दि. 1 जानेवारी पासून त्याची कार्यवाही प्रारंभ होणार आहे.