ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात वाढत चाललेले हे संकट जात आणि धर्म पहात नाही. त्यामुळे जाणीवपूर्वक चुकीचे व्हिडिओ पसरवू नका. महाराष्ट्राच्या एकीला कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करणार असेल तर सहन केले जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
कोरोनाशी दोन हात करताना अजून एक व्हायरस समोर येत आहे. काही लोक दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करूच आणि कोरोनापासून महाराष्ट्राला देखील वाचवू असंही ते यावेळी म्हणाले.
मी सिंगापूरच्या पंतप्रधानांच भाषण बघितलं त्यांनी देखील लॉक डाऊन जारी केले आहे. आपण ज्या गोष्टी केल्या त्या संपूर्ण जगानेही केल्या. त्याच गोष्टी आता सिंगापूरही करत आहे. याचाच अर्थ काय तर देश, जातपात, धर्म कोणताही असो विषाणू एकच आहे. त्याचा इलाज हा आता केवळ नाईलाज म्हणून घरात राहणं हा एकच आहे. असंही उध्दव ठाकरे म्हणाले.
त्याचबरोबर पुढील सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणताही धार्मिक कार्यक्रम, उत्सव, क्रिडा सोहळे होणार नाहीत. गुढीपाडवा, पंढरपूर वारी, रामनवमी घरी साजरे झाले. अन्य धर्मीयांनी ही आता तसेच करावे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी सोलापूरच्या आराध्याच विशेष कौतुक केले. ते म्हणाले आराध्याने जनतेसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. आज तिचा वाढदिवस आहे तिने वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली नाही. सात वर्षांच्या मुलीमध्ये ही समज आली असेल तर आपण हे युद्ध जिंकलच समजायचं असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.