संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय लष्कराचे कौतुक करताना परिस्थितीनुरुप वेळीच योग्य निर्णय घेतल्यास कोणत्याही देशाचे सैन्य युद्धात बलवान बनते, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी येथे केले. ‘कंट्रोलर्स कॉन्फरन्स 2022’ मध्ये त्यांनी युद्ध धोरणाबाबत भाषण केले. यादरम्यान संरक्षणमंत्र्यांनी संरक्षण संसाधनांच्या उपलब्धतेवरही भर दिला. युद्धाच्या तयारीसाठी जलद पारदर्शक निर्णय घेणे आणि सर्वोत्तम संसाधनांची उपलब्धता आवश्यक असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.
संरक्षण लेखा विभागाद्वारे आयोजित ‘कंट्रोलर्स कॉन्फरन्स 2022’मध्ये संरक्षणमंत्र्यांनी विविध मुद्दय़ांसंबंधी भाष्य केले. एखाद्या देशाच्या युद्धाच्या तयारीसाठी केवळ सर्वोत्तम संसाधने उपलब्ध असणे आवश्यक नाही तर जलद पारदर्शक निर्णय घेणे देखील आवश्यक आहे. निर्णय घेण्यास दिरंगाई झाल्यास युद्धाच्या तयारीत काही त्रुटी राहतील, असे ते म्हणाले. युद्धादरम्यान घ्यावयाच्या खबरदारीवर त्यांनी भर देऊन भारतीय लष्कराचे मनोबल वाढवले.
देशातील संरक्षणस्थिती हाताळली जात असताना निर्णय घेण्यास उशीर झाल्यास वेळ आणि पैशाचा अपव्यय होतो आणि युद्ध तयारीवर परिणाम होतो, असे ते म्हणाले. जगभरात संसाधने मर्यादित असल्याने त्यांचा वापर करताना आर्थिक क्षेत्र समजून घेण्यावर त्यांनी भर दिला. संसाधनांचा योग्य ठिकाणी वापर झाला पाहिजे. ते अजिबात वाया जाऊ नयेत. ‘एक रुपया वाचवल्यावर आपल्याला एक रुपया अतिरिक्त मिळतो’ हे संसाधनांच्या बाबतीत पूर्णपणे लागू होते, असे ते म्हणाले.