-‘सीपीसीबी’चा अहवाल, राज्यातील एकूण 55 नद्यांचा समावेश, वाशिष्ठी, सावित्रीसह मुचकुंदी नद्यांचा समावेश
प्रतिनिधी/ चिपळूण
देशभरात एकूण 311 नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात राज्यातील तब्बल 55 नदीपट्ट्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. यामध्ये वाशिष्ठी, सावित्री व मुचकुंदी हे जिल्ह्यातील 3 नदीपट्टे प्रदूषित असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) अहवालातून स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जल गुणवत्ता व्यवस्थापन विभागाने ‘पोल्युटेड रिव्हर स्ट्रेचेस फॉर रिस्टोरेशन ऑफ वॉटर क्वॉलिटी’ हा अहवाल तयार केला आहे. यामध्ये देशभरातील 603 नद्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. यापैकी 30 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 279 नद्यांमधील 311 नदीपट्टे प्रदूषित असल्याचे आढळून आले. त्यात सर्वाधिक 55 प्रदूषित नदीपट्टे महाराष्ट्रात आहेत. त्या खालोखाल मध्यप्रदेशमध्ये 19, बिहार आणि केरळमध्ये 18, कर्नाटक आणि उत्तरप्रदेशमध्ये 17 अशाप्रकारे या राज्यांमध्ये नदी प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे.
2018 च्या तुलनेत नदीपट्ट्यांतील प्रदूषणात घट
राज्यातील भीमा, मिठी, मुठा, सावित्री, गोदावरी, कन्हान, मुळा, पवना, इंद्रायणी, अंबा, अमरावती, बोरी, बुराई, भातसा, बिंदुसरा, चंद्रभागा, दारणा, घोड, गोमाई, गिरणा, हिवरा, कलू, कन, कोलार, कोयना, कृष्णा, कुंडलिका, मंजिरा, मोर, मोरणा, मूचकुंडी, मोरणा, नीरा, पांझरा, पाताळगंगा, पैनगंगा, पेढी, पेहलर, पूर्णा, रंगावली, सीना, सूर्या, तानसा, तापी, तितूर, उल्हास, उरमोडी, वैतरणा, वशिष्टी, वेण्णा, वाघूर, वैनगंगा, वर्धा, वेणा या नद्यांतील काही भाग प्रदूषित झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. असे असले तरी 2018 च्या तुलनेत यावेळी नदीपट्ट्यांतील प्रदूषणात घट झाल्याची सकारात्मक बाब अहवालातून समोर आली आहे. 2018 मध्ये 351 नद्यांतील 311 नदीपट्टे प्रदूषित होते.
शहरे आणि उद्योगांमधील सांडपाणी नदीत सोडले जाते. यातील रासायनिक घटक तसेच इतर टाकाऊ वस्तूंमुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होते. पर्यायाने त्या भागातील नदीच्या परिसंस्था धोक्यात येतात आणि त्याचा दुष्परिणाम निसर्ग आणि मानवी आरोग्यावर होत असल्याचे पुढे येत आहे. यामध्ये वाशिष्ठी नदीतील दळवटणे ते खेर्डी तर सावित्री नदीतील दादली ते मुठावली हा पट्टा प्रदूषित नदीपट्ट्यांमध्ये समावेश आहे.
जनतेनेच पुढे येण्याची गरज
नद्यांमधील प्रदूषणाचा विचार केला तर धोका वाढत चालला आहे. नदी प्रदूषण हे वेगवेगळ्या मार्गाने होत आहे. चिपळूणच्या वाशिष्ठी नदीचा विचार केला तर औद्योगिक आणि शहरांचे सांडपाणी हे दोन्ही या नदीला मिळत आहे. त्यामुळे नद्या वाचवायच्या असतील तर जनतेनेचे पुढाकार घेण्याची गरज आहे.
-शाहनवाज शाह
नदी समन्वयक, वाशिष्ठी नदी, चिपळूण