प्रशासन आणखी किती बळी घेणार ?
म्हासुर्ली / वार्ताहर
गरोदर महिलेला प्रसुतीसाठी रस्त्याअभावी वेळेत उपचार मिळू न शकल्याने म्हासुर्ली पैकी मधला धनगरवाडा (ता. राधानगरी) येथील भागुबाई राजाराम घुरके ( वय – २८) या महिलेचा नवजात बालकासह दुदैवी मृत्यु झाला. तर मातेच्या मृत्युमुळे दोन लहान मुली मातृ प्रेमास पोरक्या झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
म्हासुर्ली ग्रुप ग्रामपंचायत मध्ये दुर्गम डोंगर माथ्यावरील पादुकांचा धनगरवाडा, मधला धनगरवाडा,रांताबीचा धनगरवाडा येत असून येथे वाहतूकीसाठी पक्का रस्ताच नसल्याने येथील ग्रामस्थांना स्वातंत्र्यप्राप्ती नंतर ही डोंगर रानातून पायपीट करतच प्रवास करावा लागत आहे.
गुरुवारी रात्री एक वाजता मधला धनगरवाडा येथील भागुबाई घुरके या सात महिने गरोदर महिलेच्या पोटात दुखत प्रसववेदना सुरु झाल्या. मात्र अशा बिकट स्थितीत सदर गरोदर महिलेला घरच्या लोकांनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यासाठी हलचाली सुरू केल्या, मात्र मधला धनगरवाडा येथे वाहनाच्या वाहतूकीसाठी रस्ताच नसल्याने सदर महिलेवर दवाखान्यात वेळेत उपचार करण्यासाठी दाखल करता आले नाही.
अशा स्थितीत ही सदर महिलेला प्रसुतीसाठी दवाखान्यात नेण्यासाठी ग्रामस्थानीं खाटोल्याची व्यवस्था केली. मात्र त्या अगोदरच भागुबाई घुरके यांची घरात प्रसुती झाली. व त्यांनी कन्येला जन्म दिला. याच दरम्यान कोनोली आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका के.एस.तोडकर यांनी तेथे पहाटे ४ वाजता धाव घेतली. पण त्या अगोदरच सदर मातेचा नवजात बालकासह मृत्यू झाला होता.
सदर घटनेची माहिती कळताच तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.राजेंद्र शेट्टी, आरोग्य सेवक किरण लाड, आरोग्य सहाय्ययक एस.बी. खोत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत कुंटूबियांची चौकशी केली. सदर माता मृत्युबाबत बोलताना डॉ.राजेंद्र शेट्टी म्हणाले की प्रसूती मध्ये सदर मातेचा रक्तस्त्राव मोठया प्रमाणात झाल्यानेच मृत्यु झाल्याचा अंदाज त्यांनी दै. तरुण भारत बोलताना व्यक्त केला.
रस्त्याअभावी अनेकांचे मृत्यु..!
सदर चार धनगरवाडयानां जाण्यासाठी आज पक्का रस्ता नाही. परिणामी गेल्या काही वर्षात या धनगरवाड्यावरील लोकांना मृत्युला सामोरे जावे लागले आहे. तर दोन तीन महिन्यापूर्वी रात्रीच्या वेळी १४ वर्षीय सुनिल घुरके या बालकाचा मृत्यु झाला होता. त्यामुळे प्रशासन येथील जनतेचे आणखीन किती बळी घेणार असा संतप्त सवाल धनगर समाजाकडून होत आहे.