शहर वार्ताहर / राजापूर
राजापूर तालुक्यात अणूऊर्जा प्रकल्प हा कॉंगेस आघाडीच्या सत्ताकाळात आणला गेला. मात्र विद्यमान खासदार व शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी अणूऊर्जा प्रकल्पाच्या जागेवर 5 हजार मेगावॅट सोलर एनर्जी प्रकल्प राबविण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे जैतापूर अणुऊर्जासाठी आग्रही असलेल्या उभय कॉंग्रेसची जैतापूर बाबतची भूमिका काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राजापूर तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीवरील जैतापूर परीसरातील माडबन, मिठगवाणे, करेल, निवेली, वरचीवाडी या गावातील भुसंपादीत जागेवर केंद्र शासनाने न्युक्लिअर पॉवर प्रॉजेक्ट मंजूर केला. समृध्द युरेनियमवर चालणाऱया या प्रकल्पामध्ये सुमारे 16 हजार 500 मेगावॅटची एक अशा सहा अणुभटय़ा (रिऍक्टर) बसविण्यात येणार असल्याने त्यामधून दहा हजार मेगावॅट अणूऊर्जाची निर्मिती केली जाणार आहे. सुरूवातील फ्रान्सच्या अरेवा कंपनीशी भारत सरकारचा करार झाला होता. त्यानुसार अरेवा कंपनी भारताला सहा अणुभट्टय़ा पुरविणार होती. मात्र जैतापुरातील या अणूऊर्जा प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी सुरवातीपासुन कडाडून विरोध केला. गेली अनेक वर्षे प्रकल्पाविरोधात अनेक आंदोलने झाली. काही आंदोलनानी हिंसक वळणे घेतली.
राजापूरातील शिवसेनेने जैतापूर प्रकल्पाविरुध्द जोरदार आवाज उठविला होता. आमदार राजन साळवींनी यांचे नेतृत्व केले होते. साळवींसह सुमारे पंचवीस ते तीस शिवसेना पदाधिकाऱयांना काही दिवस तुरुंगवास भोगावा लागला होता. एक दशकाच्या कालखंडात जैतापूर प्रकल्पविरोधी आंदोलनाने राज्यासह देश-विदेशाचे लक्ष वेधले होते. दरम्यान भाजप शासित केद्रसरकारच्या कालावधीमध्ये या प्रकल्पाला खिळ बसली आहे. जैतापूर अणुऊर्जाबाबत कोणतेही धोरण केंद्र सरकारने न अवलंबल्यामुळे त्या प्रकल्पाबाबत उलटसुलट चर्चा सद्या तालुक्यामध्ये झडत आहेत आणि आता जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या जागेवर 5 हजार मेगावॅट सोलर एनर्जी प्रकल्प राबविण्यात यावा अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पासाठी हजारो एकर जमिन संपादित केली आहे, सद्या ही जमीन विनावापरच आहे. तर दुसरीकडे अणुऊर्जा प्रकल्पाचे भवितव्य अंधारमय दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात धोरण स्पष्ट न करता 175 गिगावॅट सोलर एनर्जी निर्माण करण्याचे धोरण जाहिर केले. यामुळे जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या जागेवर 5 हजार मेगावॅट सोलर एनर्जी प्रकल्प राबविल्यास कोकण व महाराष्ट्राच्या दृष्टिने खूप फायद्याचे ठरेल, तसेच संपादित जमिनीचाही सदुपयोग होईल. या दृष्टिने खासदार विनायक राऊत यांनी ही मागणी केली आहे.
मात्र राज्यात दोन्ही काँग्रेसहीत शिवसेना आघडीचे सरकार आहे. त्यामुळे काँग्रेसने तालुक्यात आणलेल्या अणुऊर्जाच्या जागेवर सोलर प्रकल्प उभारण्याची मागणी राऊत यांनी केली असल्याने ती दोन्ही काँग्रेसच्या पचनी पडेल का, हा महत्वाचा विषय आहे. या संदर्भात महाविकास आघाडी काय निर्णय घेते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.