सायंकाळनंतर प्रवाशांची वाढती गर्दी : पार्किंगला जागा उपलब्ध करून देण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
लांब पल्ल्याच्या रेल्वे पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांची संख्या हळूहळू वाढत आहे. यामुळे प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना रेल्वेस्थानक परिसरात वाहनांच्या पार्किंगसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. सायंकाळी 5 नंतर तर जागाच नसल्याने जेथे मिळेल तेथे वाहने पार्किंग करावी लागत आहेत. त्यामुळे पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
सायंकाळी 5 नंतर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ा सर्वाधिक धावतात. हुबळी-मुंबई, वास्को-हजरत निजामुद्दिन, मिरज-बेंगळूर (चन्नम्मा एक्स्प्रेस), बेळगाव-बेंगळूर एक्स्प्रेस यासह इतर रेल्वेगाडय़ा धावतात. मुंबई, पुणे, बेंगळूर या शहरांना जाणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे सायंकाळनंतर रेल्वेस्थानक परिसरात मोठी गर्दी होताना दिसत आहे. रेल्वेस्थानकाच्या एका बाजूला नूतनीकरणाचे काम सुरू असून यासाठी लोखंड व इतर साहित्य टाकण्यात आले आहे. त्यामुळे उपलब्ध असणाऱया जागेतच वाहने पार्किंग करावी लागत आहेत.
वाहतूक कोंडीचा सामना
सायंकाळनंतर गर्दी वाढत असल्याने रेल्वेस्थानकाच्या आतमध्ये दुचाकी व बाहेर चारचाकी वाहने लावण्यात येत आहेत. त्यातच रिक्षावाल्यांमुळे गर्दीत भर पडत आहे. वाहने लावण्यास जागच मिळत नसल्याने रेल्वेस्थानकाच्या मुख्य रस्त्यावर चारचाकी वाहने पार्किंग केली जात आहेत. रेल्वे आल्यानंतर प्रवासी एकदाच बाहेर पडल्याने अर्धा ते पाऊणतास वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकामध्ये पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.