१०० टक्के लसीकरण करा, मगच टेस्ट करा
प्रतिनिधी / वाकरे
सध्या शासनाच्या वतीने गावोगावी कोरोना टेस्ट घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. परंतु या टेस्टच्या घाईगडबडीत लसीकरण करायचा शासनाला विसर पडला आहे. शासनाने १०० टक्के लसीकरण करावे, नंतर टेस्ट घ्यावी,अन्यथा निर्बंध झुगारू असा इशारा कोल्हापूर जिल्हा परिषदेचे लसीकरण अधिकारी फारुक देसाई यांना बालिंगा (ता.करवीर) गावचे सरपंच मयूर जांभळे,उपसरपंच पंकज कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांनी ग्रामस्थांच्यावतीने दिला आहे.
बालिंगा गावची लोकसंख्या १० हजार इतकी असून आजअखेर फक्त ११०० लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. बहुतांश लोकांचा पहिलाही डोस झालेला नाही. याशिवाय दुसरा डोस घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार विचारणा होऊ लागली आहे.लसीकरणाला शासनाकडूनच वेळ होऊ लागला आहे.त्यात तालुका स्तरावर अँटीजेन टेस्ट,तसेच आर. टी. पी. सी. आर. टेस्टची सक्ती केली जात आहे. यामध्ये ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समिती झोकून काम करीत आहेत.बालिंगा गाव शहराशेजारी असल्यामुळे लोक जागरूक आहेत.
जर दोन दिवसात लस उपलब्ध झाली नाही तर ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समिती व ग्रामस्थ यांनी गावात घेतल्या जाणाऱ्या सर्व टेस्ट बंद करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कोरोना नियम ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समिती याला जबाबदार राहणार नाही.पुढील होणाऱ्या परिणामास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.यावेळी सदस्य नंदकुमार जांभळे,रंगराव वाडकर, अजय भवड, विजय जांभळे,कृष्णात माळी आदी उपस्थित होते.