प्रतिनिधी/कोल्हापूर
सहृयाद्री प्रतिष्ठानमार्फत महाराष्ट्रातील अनेक गडकोटांच्या संवर्धनासाठी भरीव प्रयत्न झाले आहेत. गीत ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून शिवरायांच्या जीवनकार्य, पराक्रमाच्या प्रसंगाचा इतिहास समाजासमोर यावा, असे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले. राधाई डिजीटल रेकॉर्डिंग स्टुडिओ येथे आज, मंगळवारी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते सहृयाद्रीचा रणसंग्राम या गीत ध्वनीमुद्रण सोहळा पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. या उपक्रमाची फेसबूक लाईव्हव्दारे माहिती महाराष्ट्रभर प्रसारीत करण्यात आली.
यावेळी बोलताना खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले, सहृयाद्री प्रतिष्ठान गड किल्ले संवर्धनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. देशातील सर्वात मोठी इतिहास संवर्धन संस्था म्हणून सहृयाद्री प्रतिष्ठानचा लौकिक आहे. संस्थेतर्फे महाराष्ट्रातील अनेक गडकोटांच्या संवर्धनासाठी भरीव प्रयत्न झाले. यापुढे जाऊन मनामनात शिवचरीत्र आणि शंभूचरीत्र गीत रुपाने रुजावे. तरुणाईच्या ओठावर हा इतिहास सतत गुणगुणला जावा. यासाठी सहृयाद्रीने एकुण बारा गाण्यांच्या निर्मितीचा ध्यास घेतला आहे. त्याचप्रमाणे शिवरायांचा जीवनकार्य, पराक्रमाचा इतिहास समाजापुढे येणे गरजेचे आहे, असे सांगितले.
यानंतर बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, सहृयाद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून गड-किल्ले संवर्धनासाठी राज्यात सुमारे दहा हजार मावळे कार्यरत आहेत. गड-किल्ले उद्याच्या महाराष्ट्राची प्रेरणास्थाने आहेत. सहृयाद्रीचा रणसंग्राम या गीत ध्वनीमुद्रण मालिकेत 12 प्रेरणा व स्फूर्ती गीतांचा समावेश आहे. या संस्थेचा कार्याध्यक्ष म्हणून मला अभिमान असल्याचे सांगून प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला. यानंतर बोलताना प्राजक्ता गायकवाड म्हणाल्या, स्वराज्यरक्षक संभाजी या टिव्ही मालिकेत येसुबाई राणीसाहेब यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. त्या भूमिकेत गेल्यामुळे मला हॉर्स रायडींग शिकण्याची प्रेरणा मिळली. छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रमातून मिळविलेले गड-किल्ल्यांची जपणूक, जतन होणे गरजेचे आहे. यासाठी सहृयाद्री प्रतिष्ठान कार्यरत असून त्यांच्या उपक्रमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. यानंतर दिपक प्रभावळकर, गणेश लोणारे, युवराज पाटील यांनी मनोगते व्यक्त करून सहृयाद्री प्रतिष्ठानच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्वराज्यरक्षक संभाजी फेम येसूबाई राणीसाहेब प्राजक्ता गायकवाड, सहृयाद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर, श्रमिक गोजमगुंडे, गीतकार युवराज पाटील, शशांक पोवार, सहृयाद्री प्रतिष्ठानचे गणेश लोणारे, तरुण भारत साताराचे आवृत्ती प्रमुख व शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक प्रभावळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्रमिकने फोर्ट फेडरेशनची जबाबदारी घ्यावी : खासदार छत्रपती संभाजीराजे
महाराष्ट्रातील गड-किल्ले संवर्धनासाठी पेंद्राकडून निधी येणार आहे. श्रमिक गोजमगुंडे यांनी महाराष्ट्रातल्या बहुतांश किल्ल्यांवर प्रत्यक्ष काम उभारले आहे. दूर्ग संवर्धनाचा झंझावात म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत आहे. नव्याने होऊ घातलेल्या फोर्ट फेडरेशनच्या जबाबदारीसाठी त्यांनी सज्ज व्हावे, असे जाहीर सुतोवाच खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले.