रयत संघटनेने केंद्र सरकार विरोधात पुन्हा केले आंदोलन
बेळगाव
राजस्थानमध्ये राष्ट्रीय किसान मोर्चाचे मुख्य नेते राकेश टिकैत यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. त्याचा आम्ही निषेध करत आहे. जोपर्यंत जाचक कायदे रद्द केले जात नाहीत तोपर्यंत संपूर्ण देशभरात आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. हल्ला करण्यापेक्षा चर्चा करण्यास पुढे या, असे म्हणून शेतकऱयांनी केंद्र सरकारला आव्हान दिले आहे. जिह्यातील विविध शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदन देऊन या हल्ल्याचा निषेधही नोंदविला आहे.
राष्ट्रीय किसान मोर्चाचे मुख्य नेते राकेश टिकैत हे विविध राज्यांमध्ये जाऊन केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत आहेत. याचबरोबर आंदोलनकर्त्यांना ते आवाहन करत आहेत. केंद्र सरकारने जे जाचक कायदे केले आहेत ते रद्द करावेत, जोपर्यंत हे कायदे रद्द होणार नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे. विविध राज्यांमध्ये जाऊन शेतकरी संघटनांशी ते चर्चा करत आहेत. असे असताना त्यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. तो निंदनीय असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करून त्याचा निषेध नोंदविला. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रकाश नाईक, आप्पासाहेब देसाई, सिद्धगौडा मोदगी, जयश्री गुरण्णावर, राजू मरवे, बबन मालाई, मारुती कडेमनी, भोमेश बिर्जे, गजानन राजाई यांच्यासह मोठय़ा संख्येने शेतकरी उपस्थित होते. शेतकऱयांचे आंदोलन असल्यामुळे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता..