प्रतिनिधी/ सातारा
कोरोना विषाणू संसर्गामुळे सुरु असलेल्या तिसऱया लॉकडाऊनच्या सत्रात शासनाने थोडी ढील दिल्याने परप्रांतिय कामगारांना त्यांच्या गावी जाण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हाभरातून एस. टी. तसेच रेल्वेने कामगार रवाना होवू लागले असून साताऱयातील सुमारे एक हजार 307 कामगार पुरुष, महिला सायंकाळी 5 वाजता सातारा रेल्वेस्थानकातून सोडण्यात आलेल्या खास रेल्वेने मध्यप्रदेशातील रेवाकडे रवाना झाले.
सातारा रेल्वे स्थानकावर यावेळी स्वतः जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला व इतर शासकीय अधिकारी जातीने उपस्थित होते. प्रशासनाने या मजुरांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून काळजी घेतली व शिस्तबध्दपणे सर्वांना गाडी बसवले. 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर अचानक झालेल्या निर्णयामुळे सातारा जिल्हय़ासह सातारा शहरात हजारो परप्रांतिय कामगार व त्यांचे कुटुंबिय अडकून पडले. लॉकडाऊन काळात सातारा जिल्हा परिसरात असलेली परप्रांतीय कुटुंब ज्यांची काम नसल्याने सध्या कामा विना उपासमार होत हाती.
शासनाकडून अशा कामगारांना निवारा तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र या सर्वांना त्यांच्या गावची ओढ लागली होती. राज्य व केंद्र शासनाच्या आदेशानुसार रीतसर परवानगीने परप्रांतिय मजुरांना पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा परप्रांतीय व मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मंगळवारी सातारा रेल्वे स्थानकातून विशेष रेल्वे रवाना करण्यात आली. या रेल्वेमधून 1307 परप्रांतीय कुटुंब आपल्या गावी म्हणजे मध्यप्रदेशातील रेवा या ठिकाणी रवाना झाली.