महागाई, अदानी, चीनशी संबंधित मुद्दे; भाजपचे रोखठोक प्रत्युत्तर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
केंद्रातील मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काँग्रेसने 9 प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यासाठी पक्षाने ‘9 वर्षे, 9 प्रश्न’ नावाची पुस्तिकाही शुक्रवारी जारी केली. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी हे 9 प्रश्न अनेकदा उपस्थित केले. मात्र आजपर्यंत कोणतेही उत्तर आलेले नाही. यावर आता पंतप्रधानांनी मौन तोडण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले. त्यानंतर भाजपने रोखठोक प्रत्युत्तर देत काँग्रेसच्या प्रश्नांचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काँग्रेसनेही 9 प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तरे भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहेत. “काँग्रेसने विचारलेले 9 प्रश्न हे खोटेपणाचे पोतडे आहेत. हा काँग्रेसच्या निर्लज्जपणाचा कळस आहे.” असे रविशंकर प्रसाद म्हणाले. “तुम्ही टीका करा, पण टीका करून देशाच्या संकल्पाला कमकुवत करू नका, हा देशाचा मोठा अपमान आहे. कोरोना काळात लाखो सेवा कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, ऊग्णवाहिका चालकांनी देश वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. अशा स्थितीत त्यांच्या किंवा मोदी सरकारच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करण्यात कोणतेच स्वारस्य नसल्याचे ते पुढे म्हणाले.
काँग्रेसला सध्या काहीच दिसत नाही!
आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आज 16 हजार कोटी ऊपयांची संरक्षण निर्यात होत आहे. मोबाईल उत्पादनात भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा उत्पादक बनला आहे. भारतात डिजिटल पेमेंटचा आकडा 10 अब्ज डॉलर आहे. आज भारत विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे. काँग्रेसला हे सर्व दिसत नसेल तर कोणी काहीही काय करू शकत नाही, असेही रविशंकर प्रसाद म्हणाले.
पुस्तिका जारी
मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जयराम रमेश यांनी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक पुस्तिका जारी करत पंतप्रधान मोदींना 9 प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांमध्ये अर्थव्यवस्था, शेती, भ्रष्टाचार, राष्ट्रीय सुरक्षा, चीनची घुसखोरी, सामाजिक न्याय, लोकशाही आणि संघराज्य, लोककल्याणकारी योजना आणि कोरोना काळातील गैरव्यवस्थापन आदी मुद्यांना स्पर्श करण्यात आला आहे.
काँग्रेसने उपस्थित केलेले प्रश्न
- देशात महागाई आणि बेरोजगारी गगनाला का भिडत आहे? तुम्ही सार्वजनिक मालमत्ता तुमच्या मित्रांना का विकता?
- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट का झाले नाही? शेतकऱ्यांसाठी एमएसपी कायदा का केला नाही?
- एलआयसी आणि एसबीआयमध्ये जमा झालेला सामान्य लोकांचा पैसा अदानींच्या फायद्यासाठी का वळवला जातो? अदानींच्या कंपनीत 20 हजार कोटी ऊपये कोणाचे आहेत? पंतप्रधान उत्तर का देत नाहीत?
- चीन आमच्या जमिनीवर कब्जा करत असताना त्यांना क्लीनचिट का दिली? चीनसोबत 18 बैठका झाल्या, तरीही त्यांनी भारतीय भूभाग सोडण्यास नकार का दिला?
- मतविभाजनाचे राजकारण निवडणुकीच्या फायद्यासाठी वापरले जात असून समाजात भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याबाबत पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावे.
- महिला, दलित, अल्पसंख्याक यांच्यावरील अत्याचारावर पंतप्रधान गप्प का? जात आधारित जनगणनेच्या मागणीवर पंतप्रधान गप्प का?
- घटनात्मक आणि लोकशाही संस्था कमकुवत का होत आहेत? विरोधी पक्षनेते आणि विरोधी सरकारांना का टार्गेट केले जात आहे?
- मनरेगासारखी योजना कमकुवत का केली जात आहे? गरीब, आदिवासी, गरजूंच्या स्वप्नांचा चुराडा का होत आहे? 9. कोरोनामध्ये गैरव्यवस्थापनामुळे जीव गमावलेल्या 40 लाख लोकांच्या कुटुंबियांना न्याय का मिळाला नाही?