प्रतिनिधी/ सातारा
किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत होती. अनेकांनी आपले अर्ज दाखल केले होते. निवडणुकीच्या रिंगणात कोण असणार याकडे लक्ष लागून राहिले होते. मंगळवारी दुपारीपर्यंत नाटय़मय घडामोडी घडल्यानंतर 199 अर्ज मागे घेण्यात आले. निवडणुकीच्या रिंगणात किसनवीर कारखान्याचे चेअरमन मदन दादा भोसले विरुद्ध आमदार मकरंद पाटील असे दोन पॅनल उभे आहेत. निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडून ही दोन्ही पॅनेलने वाईमधूनच प्रारंभ केला. त्यामुळे आता प्रचाराची राळ उडणार आहे. मतदान दि. 3 मे रोजी होणार असल्याने याकडे सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱयांच्या राजकारण्यांच्या नजरा आहेत.
किसनवीर कारखाना निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक होते. यामध्ये हौसे गवसे नऊशे यांचाही समाज समावेश होता. ही निवडणूक कशी होणार सर्वपक्षीय समावेश असणार का महाविकासआघाडी विरुद्ध भाजप असणार का ? अशी चर्चा मंगळवारपर्यंत सुरू होती. कारखाना सुरू का केला नाही, गतवर्षीची बिले का दिली नाहीत, कामगारांचे पगार का दिले नाही, असा आरोप विरोधकांकडून सत्ताधाऱयांच्या वर केला जात आहे. तर सत्ताधाऱयांकडून किसनवीर कारखाना अडचणीत आणण्यामध्ये कर्ज मिळू न देण्यामध्ये विरोधकांचा मोलाचा वाटा आहे. कारखाना मुळाच्या ओढय़ावरील कोणी नेला असाही सत्ताधाऱयांकडून विरोधकांवर आरोप होत होता. त्यामुळे किसनवीर कारखान्याची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी समविचारी असलेल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कारखाना लढण्याबाबत निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही जोरदार तयारी केली. मात्र अर्ज दाखल झाल्यानंतर छाननी वेळी घेण्यात आलेल्या हरकतीवरून दोघांचेही अर्ज अवैध ठरवले गेले. त्यावर अपील करून झालेल्या निर्णयानुसार त्यांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. त्या अर्जावर न्यायालयात प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दोन्ही गटाकडून पॅनल करण्याबाबत विशेष घडामोडी वाई शहरात सुरू होत्या. सकाळपासून वाई शहरातील आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील याच बरोबर राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते वाईत तळ ठोकून होते.
दुसऱया बाजूला किसनवीर कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले यांच्यासह त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते वाईमध्ये पॅनल टाकण्याच्या अनुषंगाने चर्चा विनिमय करत होते. दुपारी तीन वाजेपर्यंत दोन्ही गटातून कोणी कोणी अर्ज मागे घ्यायचा यासाठी विनंती करण्यात येत होते. दुपारी तीन वाजेपर्यंत 199 जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात दादा विरुद्ध आबा असेच पॅनल उरले आहे. दि. 3 पर्यंत निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा किसनवीर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उडणार आहे. गावागावात किसनवीर कारखान्याच्या निवडणुकीची चर्चा रंगणार आहे.
निवडणुकीमधून शेतकरी संघटनेची माघार
शेतकऱयांच्या हिताकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटना रयत क्रांती संघटना यास शेतकरी संघटनेने उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी या सर्व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले अर्ज मागे घेतले. त्याबाबत माहिती देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके म्हणाले, शेतकरी सभासदांच्या हितासाठी निवडणूक होणे महत्त्वाचे होते. ती निवडणूक होत आहे. त्यामुळे आम्ही अर्ज मागे घेतले असले तरीही सभासदांचे हित जपणाऱया उमेदवारांच्या पाठीशी आम्ही आहोत, असे त्यांनी सांगितले.
आमदार मकरंद पाटील यांनी घेतले गणरायाचे दर्शन
आमदार गटाचे पॅनल फिक्स झाल्यानंतर दुपारी कार्यकर्त्यांसह आमदार मकरंद पाटील यांनी वाईच्या गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांसोबत प्रचाराची रणनीती आखण्याची या अनुषंगाने चर्चा केली.
वाईमधूनच मदन दादांचा प्रचाराचा नारळ फुटला
कारखान्याचे विद्यमान चेअरमन मदन दादा भोसले यांच्या पॅनल बाबत दिवसभर वाई येथील किसनवीर कारखान्याचे संचालक चंद्रकांत काळे यांच्या निवासस्थानी जोरदार खलबते सुरू होती. भाजप व समविचारी पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्यांनी येथूनच प्रत्यक्ष चर्चा करून प्रचाराचा नारळ फोडण्यात आल्याचे समजते.
दोन्ही पॅनलचे उमेदवार
मदन भोसले यांच्या पॅनलमधून कवठे खंडाळा गटातून दत्तात्रय गाढवे, प्रविण जगताप, प्रताप यादव, भुईज गटातून मदन भोसले, जयवंत पवार, दिलीप शिंदे, बावधन गटातून चंद्रसेन शिंदे, सचिन भोसले, विश्वास पाडळे, सातारा गटातून भुजंगराव जाधव, चंद्रकांत इंगवले, अनिल वाघमळे, कोरेगाव गटातून मेघराज भोईटे, नवनाथ केंजळे, शिवाजी पवार, महिला राखीव मधून विजया पवार, आशा फाळके, अनुसूचित जाती जमातीमधून सुभाष खुडे, विमुक्त जाती जमातीमधून चंद्रकांत काळे, इतर मागास प्रवर्गातून आनंदा जमदाडे, सोसायटी मतदारसंघातून रतनसिंह शिंदे तर आमदार मकरंद पाटील यांच्या पॅनलमधून कवठे गटातून नितीन पाटील, रामदास गाढवे, किरण काळोखे, भुईज गटातून प्रमोद शिंदे, रामदास इथापे, प्रकाश धायगुडे, बावधन गटातून शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ, हिंदुराव तरडे, सातारा गटातून संदीप चव्हाण, बाबासाहेब कदम, सचिन जाधव, कोरेगाव गटातून सचिन साळुंखे, ललित मुळीक, संजय फाळके, सोसायटी गटातून आमदार मकरंद पाटील, महिला मधून सुशीला जाधव, सरला वीर, ए.सी. मधून संजय कांबळे, एन.टी.मधून हनुमंत चौरे ओबीसी मधून शिवाजी जमदाडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.