उगवेवासियांना आमदार प्रवीण आर्लेकर यांचे आवाहन, विश्वासात घेऊनच काम करणार, नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन
प्रतिनिधी /पेडणे
उगवे येथून जाणाऱया राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण स्थानिकांना विश्वासात घेऊनच केले जाईल, रस्त्यासाठी विरोध करून आठकाठी आणू नका. ज्याच्या जामिनी गेल्या त्यांनी आपले जमिनीचे कागदापत्रे सरकारच्या संबंधित खात्याकडे सादर करा. त्यानंतर नुकसान भरपाई लवकर मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न कराणार, असे आश्वासन प्रवीण आर्लेकर यांनी उगवे येथील ग्रामस्थांना दिले.
राष्ट्रीय महामार्गाचे काम उगवे परिसरात रुंदीकरण करण्यास विलंब झाला होता. दरम्यान, बुधवारी ग्रामस्थ आणि बागायतदारांनी रस्त्याचे काम रोखले. जोपर्यंत आम्हाला आमची नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम करू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. त्यानंतर बुधवारीच स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनी एक विशेष बैठक उगवे येथील माऊली मंदिरात भूसंपादन अधिकारी चंद्रकांत शेटकर, कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी वेणू, आश्विनी गुप्ता, मारिओ, रस्ता विभागाचे कार्यकारी अभियंते आत्माराम गावडे, आभियंता दिनेश तारी, सुरेश कर्पे, सरपंच सुबोध महाले इतर पंच आदींसह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या बैठकीत योग्य तो तोडगा काढण्याविषयी चर्चा केली.
यावेळी ग्रामस्थांनी या महामार्गाच्या रुंदीकरणाविषयी पूर्ण माहिती द्यावी, अशी सूचना अधिकाऱयांसमोर मांडली. जोपर्यंत आमची नुकसान भरपाई मिळत नाही तसेच पूर्णपणे रस्त्याचा आराखडा सादर होत नाही. तोपर्यंत रस्त्याचे काम करू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
पंचायत मंडळाने कागदपत्रे गोळा करावी!
ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना योग्य ती भरपाई आपण मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून देणार आहे. ज्यांची कागदपत्रे अजून उपलब्ध झाले नाही. ती सर्व कागदपत्रे यांच्या जमिनी व त्यांचे अधिकार याविषयी उगवे मोपा सरपंच आणि पंचायत मंडळांनी जबाबदारी घेऊन ती कागदपत्रे सादर करावी. ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना योग्य तो मोबदला मिळवून दिला जाईल. अशी ग्वाही प्रवीण आर्लेकर यांनी दिली. या महामार्गाच्या कामाला कोणीही कसलीही आडकाठी आणू नये. ज्या अडचणी असतील त्या एकत्रित बसून सोडवूया. आपले पूर्ण सहकार्य आहे, अशी ग्वाही आमदार प्रवीण आर्लेकर यांनी यावेळी ग्रामस्थांना दिली.
सरपंच सुबोध महाले यांनी सध्या भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर निवडून आलेले आहेत. त्यांनी दिलेले आश्वासन आणि ते प्रत्यक्ष कृती करून या नागरिक आणि ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्यांना नक्कीच न्याय देतील, असा विश्वास व्यक्त केला. स्थानिकांना आजपर्यंत विश्वासात घेतलेले नाही. नुकसान भरपाई अगोदर द्यावी आणि नंतर रस्ता करावा, अशी मागणी माजी सरपंच विनायक महाले यांनी यावेळी केली. ज्या पद्धतीने मारिया बार आणि तोरसे येथील किनारा हॉटेलच्या सोयीसाठी रस्तामार्गात बदल केला. तोच नियम येथे का लावला जात नाही? असा सवाल विनायक महाले यांनी केला. यावेळी रामदास महाले, शंकर महाले,प्रमोद परब आणि अनेक नागरिकांनी आपापल्या समस्या मांडलेल्या आहेत.
कागदपत्रे सादर करा, नुकसान भरपाई घेऊन जा!
जमीन संपादन प्रकियेवेळी ज्यांना नोटिसा पोचल्या त्याचवेळी आपली कागदपत्रे सादर करून आपल्या जमीत हक्काबाबत सरकारला माहिती देणे बंधनकारक होते. परंतु, काहींनी अद्यापही आपली कागदपत्रे सादर केलेली नाहीत. जमीन संपादन प्रक्रियेचे सर्व पैसे सरकारी तिजोरीत जमा आहेत. ते केव्हाही शेतकऱयांनी आपली कागदपत्रे सादर करून घेऊ शकता, अशी माहितीभूसंपादन अधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी दिली.
आम्हाला विश्वासात न घेता झाडे कापली?
यावेळी शेतकरी बागायतदारांनी सरकारसह कंत्राटदाराला दोष दिली आहे. आम्हाला विश्वासात न घेताच आमच्या बागायतीतील सर्व झाडे सपासप कापली गेली. अनेक पोफळी त्याला सुपाऱया लागल्या होत्या. तेही कापल्या गेल्याशिवाय नारळाची झाडे होती त्याला नारळ होते नारळ काढण्यासाठी सुद्धा आम्हाला वेळ दिला नाही. हा अन्याय असल्याच्या तक्रारी यावेळी ग्रामस्थ आणि शेतकऱयांनी मांडल्या.
यावर आमदार प्रवीण आर्लेकर यांनी अभियंते आणि कंत्राटदारांना सूचना करताना दोन दिवस अवधी ज्यांच्या बागायती आहे आणि ज्या बागायती मधून जी झाडे कापली जाणार किंवा जी नारळाची झाडे आहेत त्या झाडांचे नारळ काढण्यासाठी त्यांना अवधी द्यावा. कापलेली झाडे अधिकाऱयांनी संबधित मालकाकडे सुपूर्द करावी, अशी सूचना केली
दरम्यान, राष्ट्रीय रस्ता करत असताना गावात जाणाऱया सर्व्हिस रस्त्यांसाठी अजूनही सरकारने जमीन संपादन न केल्यामुळे हा घोळ निर्माण झाला आहे असेही काही नागरिकांनी सांगितले.