ट्रोजन डिमेलो यांचा आरोप
प्रतिनिधी/ पणजी
अमलीपदार्थांचे समुळ उच्चाटन करण्यादृष्टीने प्रत्यक्षात कोणतीही कृती न करता केवळ घोषणाबाजी करणाऱया भाजप सरकारवर गोवा तृणमूल काँग्रेसचे माध्यम समन्वयक ट्रोजन डिमेलो यांनी जोरदार टीका केली आहे.
शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी आयटी समन्वयक तनोज अडवलपालकर आणि प्रवक्ते पीटर आफोन्सो यांची उपस्थिती होती. राज्यात येणारे विदेशी पर्यटक आणि स्थलांतरित मजूर आपल्यासोबत अमलीपदार्थ आणतात, असा आरोप करणारे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतेच केले होते. ते विधान लोकांची दिशाभूल करणारे आहे, असे डिमेलो म्हणाले. गोव्यात 2012 पासून भाजपची सत्ता आहे आणि तेव्हापासून स्थानिक राजकारणी आणि पोलीस यांचे ड्रग्ज माफियांशी संबंध वाढत आहेत. अशावेळी जर अमलीपदार्थ विरोधी पथके चांगले काम करत आहेत तर मग अमलीपदार्थांचा व्यवहार राज्यात कसा वाढला? असा सवाल डिमेलो यांनी केला.
2018 पासून आजपर्यंत पोलिसांनी सुमारे 100 किलो वजनाच्या केटामाइनचा साठा जप्त केला. या प्रकरणाची कोणतीही चौकशी सुरू झालेली नाही. त्याचबरोबर हे जप्त करण्यात आलेले ड्रग्ज चक्क हरवत आणि गायब होत असल्याचेही वृत्त आहे. यापूर्वी 2010 मध्ये, तसेच 2014 मध्ये जप्त करण्यात आलेले ड्रग्ज पोलीस ठाण्यातून गायब झाले होते, याची माहिती डिमेलो यांनी दिली.
राज्यात घडलेल्या सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाने तर सरकारची देशभरात नाचक्की झाली. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा होता, असे डिमेलो म्हणाले.