वृत्तसंस्था/ मुंबई
2022 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 29 मे रोजी खेळवण्यात आला. या सामन्याला क्रिकेट शौकिनांनी विक्रमी उपस्थिती दर्शवली होती. या अंतिम सामन्याला 101,566 क्रिकेट शौकिनांची हजेरी होती. या स्टेडियमवर शौकिनांच्या उपस्थितीचा हा नवा विश्वविक्रम गीनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाला आहे. सदर माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली असून भारतीय क्रिकेट शौकिनांचे त्यांनी आभार मानले आहेत.
आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामना नूतनीकरण करण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा सात गडय़ांनी पराभव करून या स्पर्धेत पदार्पणातच आयपीएल चषकावर आपले नाव कोरले. येत्या फेब्रुवारी-मार्च दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ भारताच्या दौऱयावर कसोटी मालिका खेळण्यासाठी येणार आहे. या मालिकेतील दिवस-रात्रीची एक कसोटी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.