लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेतर्फे भर पावसात करवीर तहसीलवर मोर्चा
कोल्हापूर प्रतिनिधी
सरकारने केलेली रेशनवरील धान्य सोडण्याची सक्ती मागे घ्यावी, यासह विविध मागण्यांसाठी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेतर्फे सोमवारी करवीर तहसीलदार कार्यालयावर भर पावसात धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने केली. मागण्यांची सोडवणूक न केल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा यावेळी देण्यात आला.
संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष व रेशन बचाव समितीचे प्रवक्ते कॉ. चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. भर पावसात निघालेल्या या मोर्चात आंदोलक मोठय़ा संख्येन सहभागी झाले होते. सीपीआर चौक मार्गे करवीर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या ठिकाणी घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदार शितल मुळे-भामरे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
निवेदनातील मागण्या अशा, ‘अन्न धान्याच्या अनुदान योजनेतून बाहेर पडा’ या योजनेचे फॉर्म भरणे बंद करावे, सर्वांना रेशनचा अधिकार द्या, रेशनवर गहू, तांदुळ व्यतिरिक्त तेल, डाळ, साखर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध कराव्यात, रेशनवरील उत्पन्न मर्यादा 2 लाख करावी, 2010-2011 चे सामाजिक-आर्थिक सर्व्हेक्षण करुनच त्याचे आधारावर शहरी भागात 45-34 टक्के ग्रामीण भागात 76-32 टक्के जनतेस योजनेचा लाभ मिळतो, त्यामुळे 2011-2022 फेर सर्व्हेक्षण करावे, नोंदीत बांधकाम कामगार, ऊस तोडणी कामगार, भूमीहीन शेतमजूर, घर कामगार, असंघटीत कामगारांना लाभार्थी घोषित करावे, रेशनधान्य वेळेवर मिळालेच पाहीजे, पॉस मशिनच्या तांत्रिक अडचणी निर्माण करुन नागरिकांना वेळेवर धान्य न देणार्या प्रशासकिय अधिकार्यांवर कारवाई करावी.
आंदोलनात करवीर तालुकाध्यक्ष आनंदा कराडे, आर. के. पेंटर, हिंदुराव सुतार, शिवाजी पाटील, रमेश कांबळे, संतोष राठोड, साताप्पा जाधव, सर्जेराव कांबळे, अर्चना कांबळे, राजश्री कांबळे, भारती यादव आदी सहभागी झाले होते.