राजाराम कॉलेजमध्ये २९ सप्टेंबर रोजी युवा महोत्सव
प्रतिनिधी/कोल्हापूर
नेहरु युवा केंद्रामार्फत आजादी का अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे उद्घाटन २९ सप्टेंबर रोजी राजाराम महाविद्यालयात सकाळी ९ वाजता होणार आहे. जिल्हास्तरीय युवा उत्सवात सहभागी होण्यासाठी १५ ते २९ वयोगटातील जिल्हय़ातील रहिवासी युवक -युवतींनी नोंदणी करावी. नोंदणी अर्ज भरण्यास २६ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे, असे आवाहन नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी पूजा यांनी केले आहे.
स्वातंत्र्यातील देशभक्तीची भावना व मूल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृद्धींगत करणे आणि तरुण युवा कलावंतांना व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या उद्देशाने चित्रकला, कविता लेखन, छायाचित्र, भाषण स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि जिल्हा युवा संमेलन ’भारत २०८७ युवा संवाद’ या कार्यक्रमांचे केले आहे. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. चित्रकला, कविता लेखन व छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम १ हजार रुपये, द्वित्तीय ७५० रुपये व तृतीय क्रमांकास ५०० रुपये बक्षीस दिले जाईल. जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम ५ हजार रुपये, द्वित्तीय २ हजार रुपये व तृतीय क्रमांकास १ हजार रुपये देण्यात येईल. जिल्हास्तरावरील विजेता स्पर्धकाची राज्यस्तरासाठी व राज्यस्तरावरील भाषण स्पर्धकांकरीता पात्र राहील. राज्यस्तरावर प्रथम २५ हजार रुपये, द्वितीय १० हजार रुपये व तृतीय क्रमांकास ५ हजार रुपये आणि राष्ट्रीयस्तरावर प्रथम २ लाख रुपये, द्वितीय १ लाख रुपये व तृतीय बक्षीस क्रमांकास ५० हजार रुपये दिले जाणार आहेत.
स्पर्धक जिल्हय़ातील रहिवासी असावा. वय १५ ते २९ वर्षे तसेच मागील वर्षामधील भाषण स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना सहभागी होता येणार नाही. एका व्यक्तीला फक्त एकाच स्पर्धेत सहभागी होता येईल. जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये (समुहाकरीता) प्रथम ५ हजार रुपये, द्वित्तीय २ हजार ५०० व तृतीय १ हजार २५० रुपये आणि जिल्हास्तरिय युवा संमेलन- ’भारत २०४७ युवा संवाद या कार्यक्रमातील सहभागी युवकांमधून चार युवकांची परिक्षकांद्वारा निवड करून त्यांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये देण्यात येईल. अधिक माहितीसाठी नेहरू युवा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.