जयसिंगपूर/प्रतिनिधी
राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाईन करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि वैद्यमापन नियंत्रक डॉ. रविंद्रकुमार सिंघल (Dr Ravinder Singal) यांचेकडे केली. यावर साखर कारखान्यांचे वजनकाटे संगणकीय प्रणाली एकत्र करून तातडीने ऑनलाईन करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले.
राज्यात यंदाचा उसाचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. अनेक साखर कारखान्यांकडून उसाची सर्रास काटामारी होत आहे. तसेच दि. ७ नोव्हेंबर रोजी पुणे येथील साखर संकुलवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा (Swabhimani Shetkari Sanghatana) धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांचे मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, उसाच्या वजनात मोठ्या प्रमाणात तफावत येत असल्याने शेतकऱ्यांची प्रचंड मोठी लूट सुरू आहे. महाराष्ट्रात सुमारे ३५ लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी उसाचे वजन काटे हे विश्वासार्ह व अचूक असणे आवश्यक आहे. वजन काट्यामध्ये पारदर्शकता नसल्याने वजनात मोठी तफावत येते. खासगी काट्यावर वजन केलेला ऊस साखर कारखानदार नाकारत असल्याच्या तक्रारी येतात. शेतकऱ्यांना पावत्या दिल्या जात नाही. त्यासाठी आपण या विषयाकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे.

हे ही वाचा : मला कितीही त्रास दिला तरी मी तुमच्या उरावर बसेन; खडसेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या या तक्रारीचे गांभीर्य पाहता वैद्यमापन विभागाकडून यावर त्वरीत कार्यवाही होऊन साखर कारखान्यांचे वजन काट्यांचे कॅलिब्रेशन मध्ये एकसमानता, सुसुत्रता व पारदर्शकता राहणे करीता सर्व वजन काट्यांची कार्यन्वयिन संगणक प्रणाली एकच असणे व त्याचे कॅलिब्रेशन नियंत्रण वैधमापन विभागाकडून व्हावे, यासाठी तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. १५ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वजन काटे ऑनलाईन करणेसाठी एकमुखी ठराव घेण्यात आला आहे. राज्यातील साखर कारखान्यांचे सर्व वजन काटे ऑनलाईन करून वजन काट्यांचे कॅलिब्रेशन मध्ये पारदर्शक आणून संगणक प्रणाली एकच ठेवावे, तसेच त्याचे कॅलिब्रेशन नियंत्रण वैद्यमापन विभागाकडूनच व्हावे, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.