खानापूर / प्रतिनिधी
शहरासह तालुक्यात आजादी का अमृत महोत्सव या अभियानाला उत्स्फूर्तपणे सुरुवात झाली असून शहरातील शासकीय कार्यालयात शाळा तसेच घराघरांवर तिरंगा ध्वज शनिवार दि. 13 ऑगस्टपासून फडकाविला गेला. शनिवारीच शहरात स्वातंत्र्य दिनासारखे उत्साही वातावरण होते.
शनिवारी पहाटेपासूनच शहरात तिरंगा ध्वज फडकविण्यासाठी घराघरातून तयारी सुरू होती. सकाळी 7 वाजता शाळा, महाविद्यालय व सरकारी कार्यालयात ध्वजवंदन करून तिरंगा फडकविण्यात आला. यावेळी देशभक्तीपर गाणी ऐकावयास मिळत होती.
रविवारी भाजपच्यावतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात येथील बसवेश्वर मूर्तीला हार अर्पण करून या दुचाकी तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली. यानंतर शिवस्मारक येथील शिवाजी मूर्तीला हार अर्पण करून शहरातून फिरुन नंदगडला रवाना झाली. नंदगड येथील संगोळी रायण्णा यांच्या समाधीस्थळावर या रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीत तालुक्यातील तरुण, तरुणींचा मोठा सहभाग होता. झांजपथकासह ढोलताशे इतर वाद्यांच्या निनादात ही रॅली काढण्यात आली. यामुळे शहरात तिरंगामय वातावरण निर्माण झाले होते. या तिरंगा रॅलीत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह इतर नागरिक सहभागी झाले होते. रविवारी सायंकाळी 7 वाजता खानापूर शिवस्मारक ते संगोळी रायण्णा समाधीस्थळ नंदगडपर्यंत भाजपच्या युवा मोर्चाच्यावतीने तिरंगा पदयात्रेला सुरुवात झाली. रात्री 11 वाजता समाधीस्थळावर पोहोचल्यानंतर या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात आली. यानंतर रात्री 12 वाजता तिरंगा फडकविण्यात आला.