उच्च न्यायालयाचा आदेश : आता तरी काम बंद होणार का?
प्रतिनिधी /बेळगाव
येथील दिवाणी न्यायालयाने हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला कायमस्वरुपी स्थगिती दिली होती. तरीदेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने हे काम सुरूच ठेवले. त्यामुळे शेतकऱयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. शेतकऱयांच्यावतीने ऍड. रविकुमार गोकाककर यांनी शेतकऱयांची बाजू मांडली. धारवाड खंडपीठाने त्यांची बाजू ऐकून घेऊन हलगा-मच्छे बायपासचे काम तातडीने बंद करावे, असा आदेश दिला आहे. त्यामुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे.
हलगा-मच्छे बायपासचे काम दडपशाही करत सुरूच करण्यात आले होते. येथील आठवे दिवाणी न्यायालयाने त्या कामाला स्थगिती दिली होती. जोपर्यंत खटल्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत काम बंद ठेवावे, असे आदेशात म्हटले होते. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे काम सुरूच ठेवले होते. त्यामुळे शेतकऱयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या ठिकाणी शेतकऱयांची बाजू ऐकून घेतली. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱयांचे वकील रविकुमार गोकाककर यांनी न्यायालयाचा अवमान होत आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेव्हा शेतकऱयांना न्याय द्यावा, अशी बाजू मांडली.
चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न
धारवाड खंडपीठाने शेतकऱयांची बाजू ग्राह्य धरत जोपर्यंत बेळगावमधील दिवाणी न्यायालयातील खटल्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत काम करू नये, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे. वास्तविक न्यायालयाने जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांना सुरू असलेल्या कामांसंदर्भातील स्पष्टीकरण देण्याचे आदेश बजावले होते. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी त्यांचे स्पष्टीकरण न्यायालयासमोर दिलेच नाही. केवळ मयत झालेल्या एका शेतकऱयाच्या नावाचा उपयोग करून चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने शेतकऱयांची बाजू ग्राह्य मानत काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
यंत्रसामग्री हलवावी लागणार
उच्च न्यायालयाने आदेश दिल्यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तेथील यंत्रसामग्री हलवावी लागणार आहे. कामही बंद ठेवावे लागणार आहे. या निकालामुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे.