अध्याय एकविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, कोणतेही कर्म करत असताना तारतम्य बाळगले पाहिजे. नाहीतर कल्याणप्रद होणारे कर्म विनाशाला कारण होते. विषयापासून निवृत्ती व्हावी म्हणून गुणदोषांचे सुगम नियम करून ठेवले आहेत. हे वेदातील वर्म न कळल्यामुळे भ्रांतिष्ट लोकांना विषयाचा भ्रम पडतो. माणसाला भ्रम झाला की खोटे खरे वाटू लागते. जोपर्यंत भ्रांती असते, तोपर्यंत कर्मप्रवृत्ती असते. अंधेऱया रात्रीतच काजवे चमकत असतात, त्याप्रमाणे अज्ञान स्थितीत गुणदोषांचा पगडा फार मोठा असतो. गुणदोषांमध्ये पतन हे ठरलेलेच असते.
ज्याला देहाचा अभिमान चढतो, तो नीचाहूनही नीच होतो. रजतमादि गुणांच्या संगतीने जो विषयलंपट होऊन राहतो, त्याला तिळगुळासारख्या सुखोपभोगाने काही नवी देहबुद्धी वाढते असे नाही.
जो धोत्र्याचे बी खाऊन बरळू लागला, रंगात येऊन गाऊ-नाचू लागला की, गाठीस असलेले द्रव्य चोरीस गेले, याचे त्याला भानही नसते. त्याप्रमाणे देहाभिमानाने जो उन्मत्त होतो, अत्यंत विषयलोलुपतेने जो कामासक्त होतो, त्याला आपल्या स्वार्थाची हानी झालेली समजत नाही व आपला घात झालेलाही कळत नाही. स्त्री आणि पुरुष व्यक्ती जोपर्यंत आहेत, तोपर्यंत विषयलंपटाचा ‘स्वेच्छाचार’ हा चालायचाच. त्याला आळा पडावा म्हणून वेदाने स्वपत्नीनिष्ट लावून दिली आहे. तथापि वेदाने आज्ञा दिली म्हणून लोक आपल्या स्त्रीशीसुद्धा अहोरात्र गमन करतील हे लक्षात घेऊन, वेदानेच निर्बंध घातला आहे की, फक्त ऋतुकाळीच गमन केले पाहिजे. त्यातही पुत्र जन्मास आला असता ‘आत्मा वै पुत्रनामासि’ ह्या वाक्याने वेदाने पुरुषांना स्त्रीकामापासून परावृत्त केले आहे. अशा प्रकारे विषयाची निवृत्तीच वेदात सांगितली आहे. म्हणून वेद गुणदोष दाखवून विषयावरची आसक्तीच सोडावयास लावतात. ज्या ज्या पदार्थांपासून मनुष्याचे चित्त निवृत्त होते, त्या त्या वस्तूच्या बंधनातून तो मुक्त होतो. हा निवृत्तीरूप धर्मच माणसांसाठी परम कल्याणाचे साधन आहे. कारण हा शोक, मोह आणि भय नाहीसा करणारा
आहे.
म्हणून विषयापासून निवृत्त व्हावे हाच माझ्या वेदाचा हेतू आहे आणि ते सोडण्यासाठीच गुणदोष दाखविण्याचा उपाय योजलेला आहे. अचानकच विषयांचा त्याग करा असे सांगितले तर ते शक्मय होत नाही म्हणून निषेधरूपाने त्यांची निंदा करून हळूहळू विषय सुटतील अशी युक्ती केली आहे. जसजशी विषयाची निवृत्ती होते, तसतशी आत्मसुखाची प्राप्ती होत जाते. पूर्णपणे विरक्ती बाणली म्हणजे साधक मत्स्वरूपच होऊन
जातो.
मत्स्वरूपाच्या प्राप्तीला विषयासक्तीच आड येत असते. विषयाची निवृत्ती झाली की, साधक मत्स्वरूपच होऊन जातात. माझ्या स्वरुपाची जेव्हा प्राप्ती होते, तेव्हा अहंकार निखालस नष्ट होतो आणि शोकमोहाची शांती होऊन अविद्याही नष्ट होते. अविद्येचा नाश झाला की, त्याच्याबरोबर मरणालाच मरण आणि जीवाचे जीवपणच नाहीसे होऊन जाते. ज्याप्रमाणे सूर्योदय होताच गर्द अंधारासहवर्तमान रात्रीला थारा उरत नाही, त्याप्रमाणे अविद्या जीवासहवर्तमान ठार झाली की, संसारभयाला जागाच राहात नाही.
दृष्टि निश्चित झाली असता ज्याप्रमाणे मृगजळाचा पूर राहात नाही, त्याप्रमाणे अविद्या नष्ट झाली की, भवभयासहवर्तमान सारा संसारच मिथ्या होऊन जातो. वेदोक्त स्वधर्माचरण हे प्राण्यांचे कल्याण होण्यासाठीच आहे. आणि विषयत्यागासाठीच गुणदोषांचे निरुपण केले आहे. खरा वेदाचा अर्थ ज्यांना कळत नाही, ते वेद हा प्रवृत्तीपर आहे असे म्हणतात. पण वेदाने विषयावरील आसक्ती नष्ट करणारी विरक्तिच सांगितलेली आहे. वेदात सांगितल्याप्रमाणे स्वधर्मस्थितीने राहिले असता विषयांविषयी विरक्ती उत्पन्न होते आणि प्राणी मोक्षाला जातात, हीच माझी वेदोक्ति आहे. वेदाची आज्ञा सोडून केवळ विषयांचीच आसक्ती धरली असता प्राणी अत्यंत दुःख पावतात. तेही मी तुला सांगतो ऐक. प्रवृत्ती जितकी आहे, तितकी अनर्थकारकच आहे.
ःक्रमशः