मंत्रिमंडळ खातेवाटपाला राज्यपालांची मंजुरी : बाळासाहेब थोरातांकडे महसूल तर अशोक चव्हाणांकडे सार्वजनिक बांधकाम
प्रतिनिधी/ मुंबई
राज्य मंत्रिमंडळाचे बहुप्रतीक्षित खातेवाटप अखेर रविवारी सकाळी जाहीर करण्यात आले. शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांच्या खात्यांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या यादीला रविवारी सकाळी मंजुरी दिली.
खातेवाटप यादीनुसार, काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल; अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खाते देण्यात आले आहे. तसेच डॉ. नितीन राऊत यांच्याकडे ऊर्जा तर अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक खाते देण्यात आले आहे. राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख यांच्याकडे गृह तर जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अन्न नागरी पुरवठा खाते दिल्याने भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याची जबाबदारी देण्यात आली. पॅबिनेट मंत्रिपद ज्या पक्षाच्या वाटय़ाला आले आहेत. त्या खात्याचे राज्य मंत्रिपद हे मंत्रिमंडळात सहभागी असलेल्या इतर पक्षाकडे देण्यात आल्याचे या यादीत पाहायला मिळत आहे.
शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर उद्योग खाते पुन्हा सुभाष देसाईंकडेच ठेवण्यात आले. पहिल्यांदाच मंत्रिमंडळात समावेश झालेल्या अनिल परब यांच्याकडे परिवहन खाते देण्यात आले आहे. तर आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन या खात्याची जबाबदारी देण्यात आली. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गृहनिर्माण या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात आल्याने नगरविकास आणि गृहनिर्माण ही दोन्ही खाती ठाण्यातील मंत्र्यांकडे गेली आहेत. आता ठाण्याचे पालकमंत्री पद कोणाला मिळणार हे बघणे महत्त्वाचे ठरेल. मंत्रिमंडळातील महिला सदस्यांपैकी वर्षा गायकवाड यांच्याकडे शालेय शिक्षण तर यशोमती ठाकूर यांच्याकडे महिला आणि बालविकास खाते देण्यात आले. मुंबईतील पाचही मंत्र्यांकडे शहरी भागातील संबंधित खाती देण्यात आली आहेत.
माझ्याबाबत अफवा पसरविण्यात आली : सत्तार
शनिवारच्या नाराजीनाटय़ानंतर शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी रविवारी ‘मातोश्री’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. 20 मिनिटे चाललेल्या या बैठकीतून बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया मांडली. मी मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. माझ्याबाबत अफवा पसरवण्यात आली होती. माझी कोणतीही नाराजी नाही. मी प्रत्येक गोष्ट त्यांना सविस्तर सांगितलेली आहे. याची शहानिशा ते करतील. उद्या पुन्हा मी 5 वाजता मुख्यमंत्र्यांना भेटेन, असे सत्तार म्हणाले.