विवाहात येऊ न शकलेल्यांना करता आला अहेर
कोरोना महामारीने सर्वांना न्यू नॉर्मल साच्यात ओढले आहे. या स्थितीत वेडिंग इंडस्ट्रीही (विवाह विषयक व्यवसाय क्षेत्र) बदलली आहे. मागील काही काळात वधू आणि वर पीपीई किट परिधान करून 7 फेऱया घेताना दिसून आले, तर काही ठिकाणी पाहुण्यांशिवायच विवाह उरकावा लागला. आता तर ऑनलाईन विवाहही प्रचलित होऊ लागला आहे. याचदरम्यान विवाहाची एक निमंत्रणपत्रिका इंटरनेटवर लक्ष वेधून घेत आहे. तामिळनाडूच्या मदुराईमधील एका परिवाराने निमंत्रणपत्रिकेवर गुगल पे आणि फोनपेचा क्यूआर कोड छापून मुलीच्या विवाहात सामील अतिथी आणि महामारीमुळे विवाहसोहळय़ात उपस्थित न राहू शकणाऱयांना अहेर करण्याचा एक सोपा पर्याय दिला आहे.
शिव शंकरी आणि सरवनन यांचे मित्र/नातलग त्यांना भेटवस्तू देण्यासाठी विवाहाच्या निमंत्रणपत्रिकेवर छापलेला क्यूआर कोडही स्कॅन करू शकत होते. याचा उद्देश कॅशलेस देवाणघेवाणीला बळ देणे आणि कोविड-19 संक्रमणाची जोखीम कमी करण होता. वधू शिवशंकरीच्या आई टीजे जयंती मदुराईत एक ब्युटी पार्लर चालवितात. सुमारे 30 व्यक्तींनी या पर्यायाचा वापर करत विवाहाचा अहेर केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
कल्पनेचे होतेय कौतुक
हा विवाह सोहळा रविवारी पार पडली असून त्यानंतर याची निमंत्रणपत्रिका इंटरनेटवर प्रसारित होत आहे. अनेक जण परिवाराच्या या कल्पनेचे कौतुक करत आहे. मला अनेकांचे यासंबंधी फोन येत आहेत. कुटुंबातील अन्य लोकांनाही कौतुकाची प्रतिक्रिया मिळत असल्याचे जयंती यांनी सांगितले आहे.
हे आठवतेय का?
मागील महिन्यात केरळमधील एका कुटुंबाने कल्याण सप्पदू (विवाहसोहळय़ातील जेवण) विवाहसोहळा ऑनलाईन अनुभवणाऱया नातलग आणि मित्रांच्या घरी पोहोचविले होते. यांतर्गत त्यांनी प्रत्येक अतिथीला चार रंगीत बॅग्ज आणि केळीची पाने पाठविली होती. सर्व बॅग्जमध्ये 4 टिफिन कॅरियर होते, ज्यात 12 डिशेस पॅक होती. याचबरोबर केळीच्या पानावर कुठला पदार्थ कुठे वाढायचा यासंबंधी सूचनाही करण्यात आल्या होत्या.