प्रतिनिधी/ संकेश्वर
ग्राम पंचायतीच्या सहमतीनेच जागा निश्चित करून मणगुत्ती येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळय़ाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यावर शेजारच्या दोन गावांतील काही ग्रामस्थांनी आक्षेप घेत जागाच बदण्याची मागणी केली आहे. सदरचा केला जाणारा विरोध प्रशासनाने हाणून पाडण्याऐवजी त्यांच्या भूमिकेशी हात मिळवित पुतळाच दुसऱया जागेवर बसवावा, असा पवित्रा तालुका प्रशासन घेत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
शिवपुतळय़ाची प्रतिष्ठापना करून वादावर पडदा टाकण्याबाबत मंगळवार दि. 11 रोजी अंतिम निर्णय घेण्यात येणार होता. पण सोमवारी सकाळी मणगुत्ती गावात दाखल झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी व तालुका प्रशासन अधिकारी, शिवाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह प्रमुख ग्रामस्थांना एकत्र घेऊन गावभागात असणाऱया लक्ष्मी मंदिरानजीकच्या जागेत पुतळा प्रतिष्ठापना करण्याची घाई चालवली होती.
मणगुत्ती गावात प्रवेश केले जाणारे सर्वच मार्ग पोलिसांनी बंद केले आहेत. संपूर्ण गाव भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर चबुतऱयानजीक कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत मंगळवारीच पुतळा प्रतिष्ठापना झाला पाहिजे, या भूमिकेवर प्रशासन ठाम असल्याची परिस्थिती जलदगतीने चाललेल्या हालचालीवरुन स्पष्ट होत होते.
यापूर्वी रितसर परवाना घेऊन पुतळा बसवा, असे सांगणारे प्रशासन केवळ आठ तासात आपला निर्णय बदलून सोमवारीच नियोजित जागा बदलून दुसऱया जागेत पुतळा बसवा हा हट्ट धरण्यामागे कारण काय? असा सवाल व्यक्त होत आहे.
गावात तणावाचे वातावरण, बंदोबस्त कायम
मणगुत्ती गावात ठेवण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे गावात तणावपूर्ण वातावरण आहे. प्रमुख स्थानिक नेते, शिवाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते व प्रशासन यांची खलबते सुरू आहेत. परिणामी प्रशासनाच्या घाईची तगमग पहाता शिवाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुतळा प्रतिष्ठापनाच्या कार्यातून माघार घेत पुतळय़ाची जबाबदारी प्रमुख स्थानिक नेते व गावकऱयांनीच घ्यावी, या निर्णयाप्रत पोहचल्याची माहितीही पुढे आली आहे.