प्रतिनिधी/ कराड
आगाशिवनगर-मलकापूर येथील पोळ कुटुंबातील सदस्यांच्या कारला शनिवारी आष्टा (जि. सांगली) येथे भीषण अपघात झाला होता. या अपघातात तिघेजण जागीच ठार झाले होते तर सात वर्षीय समृद्धी सुभाष पोळ आणि सरिता सुभाष पोळ या मायलेकी गंभीर जखमी झाल्या होत्या. रविवारी पहाटे त्यांचाही उपचार घेत असताना मृत्यू झाला.
शुक्रवारी अपघातात पोळ कुटुंबाच्या आधारवड गीताबाई पोळ, त्यांचा मुलगा अधिकराव पोळ, सूनबाई सुषमा पोळ हे अपघातात ठार झाले होते. हा मानसिक धक्का पचवणे अवघड असतानाच रविवारी पोळ कुटुंबाला आणखी हादरा बसला. जखमी असलेल्या चिमुकल्या समृद्धीसह सरिता पोळ यांच्या निधनाने हा परिसर पुन्हा एकदा सुन्न झाला. अधिकराव पोळ यांच्यासह त्यांची आई गीताबाई, पत्नी सुषमा, भावजय सरिता, पुतणी समृद्धी हे सर्वजण शनिवारी सकाळी सांगली येथे नातेवाईकाच्या वास्तुशांतीसाठी अल्टो कारने निघाले होते. आष्टा येथे गाताडवाडी फाटय़ावर पोळ यांची अल्टो कार व समोरून आलेली स्विफ्ट यांची समोरासमोर जोराची धडक झाली. या धडकेत अधिकराव पोळ, गीताबाई पोळ, सुषमा पोळ जागीच ठार झाले. तर सरिता पोळ आणि त्यांची मुलगी समृद्धी पोळ गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर कराडला खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र रविवारी उपचार सुरू असताना या मायलेकींचाही मृत्यू झाला. यामुळे अपघातातील मृतांची संख्या पाचवर गेली आहे. रविवारी हे वृत्त समजताच पोळ वस्तीला पुन्हा हादरा बसला. पोळ यांच्या घरासमोर गर्दी जमली होती. दुपारी शवविच्छेदन करून या मायलेकींचे मृतदेह पोळवस्तीत आणण्यात आले. कुटुंबीयांचा आक्रोश आणि मित्रपरिवाराचे रडणे मन हेलावून सोडत होते. पोळ कुटुंबीयांवर काळाने घाला घातल्याने एकत्र कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.