आमदार वैभव नाईक यांचे प्रतिपादन : 32 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ
प्रतिनिधी / ओरोस:
सिंधुदुर्ग जिल्हय़ातून जाणाऱया मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल झाला आहे. त्यामुळे पोलिसांबरोबरच प्रत्येक वाहन चालकांची किंबहूना प्रत्येक नागरिकाची वाहन नियंत्रणात चालवून अपघात टाळण्याची जबाबदारी वाढली असल्याचे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी 32 व्या रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात बोलताना केले.
देशभरात दरवर्षी सुमारे तीन लाख अपघात घडतात. रस्त्यावर घडणाऱया या वाहनांच्या अपघातात सुमारे दीड लाख प्रवासी व वाहन चालकांना प्राण गमवावे लागतात, तर सुमारे दीड लाख प्रवासी जायबंदी होतात. याचा गांभीर्याने विचार करुन सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मागील काही वर्षापासून जानेवारी महिन्यात आर. टी. ओ. पोलीस, महामार्ग पोलीस यांच्याकडून रस्ते सुरक्षा अभियान राबविले जाते. यापूर्वी होणारा रस्ते सुरक्षा सप्ताह कार्यक्रम यावर्षी पासून एक महिना कालावधीसाठी अभियान स्वरुपात राबविला जाणार आहे.
यावर्षीचा जिल्हय़ाच्या हा कार्यक्रम महामार्ग पोलीस मदत ओसरगाव येथे घेण्यात आला. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जि. प. अध्यक्ष समिधा नाईक, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वाहतूक निरीक्षक जावेद शिकलगार, महामार्ग वाहतूक सहाय्यक निरीक्षक अरुण जाधव, ओरोस पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अविनाश भोसले. पोलीस निरीक्षक संजय डौर रोटरी क्लब कणकवली तालुकाध्यक्ष लहू पिळणकर, डॉ. विद्याधर तायशेटे, ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, चालक-मालक संघटना अध्यक्ष श्री. रावराणे, कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था संचालक अवधूत मालणकर, कसाल ज्युनियर कॉलेज प्राचार्य गुरुदास कुसगावकर, कसाल ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी, नागरिक, वाहनचालक आदी उपस्थित होते.
जि. प. अध्यक्ष समीधा नाईक यांनी पोलिसांचे रस्त्यावरील वाहतूक नियमनाचे काम हे वाहनचालकांच्या व नागरिकांच्या जीवित रक्षणासाठीच असते असे सांगत कोरोना काळातील त्यांच्या कामगिरीबाबत कौतुक केले. जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण यांनी वेगाने वाहन चालविणाऱयांच्या किंवा नियमांचे पालन न करणाऱयांच्या मानसिकतेत बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली. कुटुंबातील कर्ता माणूस अचानकपणे निघून गेल्यास कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे विद्यार्थ्याने आजपासूनच वाहतूक नियमांचे पालन करावे. व्यसनाधीनतेपासून मुक्त राहून जबाबदार नागरिक म्हणून जगावे, असे आवाहन केले.
संजय डौर यांनी पोलिसांकडून केला जाणारा दंड हा महसुलासाठी नाही तर वाहनचालकांच्या चुकीची शिक्षा म्हणून असल्याचे स्पष्ट केले. नियमांचे पालन व्हावे यासाठी कोणतीही लस देता येणे शक्य नाही. नागरिकांनी, वाहनचालकांनी नियमरुपी लस स्वत:च्या मनाला टोचून वाहन चालवताना अपघात होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे निरीक्षण जावेद शिकलगार यांनी ओव्हरटेकमुळे होणाऱया अपघातांचे प्रमाण कमी झाले असून ओव्हर स्पीडमुळे होणाऱया अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे सांगितले. एका क्षणात होत्याचं नव्हतं करणारा क्षण म्हणजे अपघात याची जाणीव त्यांनी करुन दिली.
‘वेगावर नियंत्रण, जीवनाचे रक्षण’, ‘हेल्मेट वापरा, आयुष्य वाचना’ मद्यप्राशन करुन वाहन चालवू नये अशी जनजागृतीपर वाक्ये तयार करण्यात आली असून 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत जनजागृती केली जाणार असल्याचे अरुण जाधव यांनी स्पष्ट केले.