पूर-अळणावर दरम्यान घडला अपघात : रेल्वेब्रिज ओलांडताना बसली धडक
खानापूर/ वार्ताहर
-खानापूर तालुक्मयाच्या दक्षिण टोकाला असलेल्या पूर गावातील दोन कॉलेज विद्यार्थिनी अळणावर ते पूर दरम्यान असलेला रेल्वे ट्रक ओलांडताना रेल्वेच्या धडकेत झालेल्या अपघातात एक विद्यार्थिनी जागीच ठार तर दुसरी गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. अळणावरजवळील तेरगाव सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयातील निरोप समारंभ आटोपून त्या गावी परत येत होत्या. घटनेची नोंद धारवाड रेल्वे स्थानक तसेच अळणावर पोलिसात झाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
कलावती मंजुनाथ बोभाटे व निकिता पाटील अशी सदर 18 वर्षीय विद्यार्थिनींची नावे आहेत. त्या सायंकाळी कॉलेजमधील कार्यक्रम संपल्यानंतर अळणावरपर्यंत बसने येऊन तेथून नेहमीप्रमाणे अळणावर ते पूर या चार किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावरून गावी येत असताना सदर घटना घडली.
रेल्वेब्रिज ओलांडताना घडली घटना
दरम्यानच्या रस्त्यावर एक रेल्वे मार्ग जातो. नाल्याजवळील रेल्वेमार्गावरून ब्रिज ओलांडताना त्या दोघींना मालवाहू रेल्वे येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. काही क्षणातच रेल्वेच्या धडकेने कलावती मंजुनाथ बोभाटे ही विद्यार्थिनी रेल्वेखाली सापडली व तिचा मृतदेह चेंदामेंदा झाला. सोबत असलेली निकिता पाटील हीदेखील रेल्वेच्या धडकेने बाजूला पडली. तिलाही गंभीर दुखापत झाली आहे. रेल्वे रुळाजवळ असलेल्यांना सदर घटना कळताच तातडीने जखमी निकिता पाटील हिला अळणावर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
पूरसह अळणावर भागात शोककळा
लोंढा धारवाड दरम्यान दुहेरी रेल्वे मार्गाचे सुरू आहे. पूर हे गाव खानापूर तालुक्मयातील असले तरी या गावाचा अधिकाधिक संपर्क हा अळणावर भागाशी येतो. परंतु शासकीय कामासाठी मात्र पूर या भागातील लोकांना खानापूरला यावे लागते. पण शैक्षणिक अथवा आठवडी बाजारासाठी अळणावर या भागाशी नेहमी संपर्क असतो. त्यामुळे पूर ते अळणावर या मार्गावर शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गर्दी असते. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास सदर विद्यार्थिंनी नेहमीप्रमाणे गावी परतत असताना घडलेल्या गंभीर अपघातामुळे पूरसह अळणावर भागात शोककळा पसरली आहे.