मालवण :
चौकेहून आंबेरी मार्गे धामापूरला जाणाऱ्या ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजने’तील रस्त्याचे अवघ्या तीन वर्षात तीनतेरा वाजले आहेत. साडे सहा किमीच्या रस्त्याची पुर्णतः चाळण झाल्याने वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी रस्त्याला खचला असून वाहतुकीस हा मार्ग पुर्णतः धोकादायक बनला आहे.
चौके बावखोल ते आंबेरी मार्गे धामापूर हा रस्ता ग्रामविकास मंत्रालयाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर केला. या रस्त्यासाठी ४२५.६१ लाख रुपये खर्ची घालण्यात आले. या रस्त्यामुळे आंबेरीतील ग्रामस्थांना कुडाळला जाण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध झाला होता. मात्र रस्ता केल्यापासून अवघ्या तीन वर्षात रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. तसेच कंत्राटदाराने काम पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षे देखभाल दुरुस्ती करणे बंधनकारक आहे, मात्र संबंधित ठेकेदाराकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. संबंधित विभागाने दखल न झाल्यास ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
संबंधित विभागाने रस्त्याच्या डागडुजीबाबत कार्यवाही करावी, याबाबत आंबेरी ग्रामपंचायतीनेही याप्रश्नी लक्ष वेधले आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हा मार्ग ठिकठिकाणी दोन फूट खचला आहे. बऱ्याच ठिकाणी मार्गानजीक घळण कोसळलेल्या असल्याने रस्त्यावर दगड, माती वाहून आलेली आहे. त्यामुळे वाहने चालविणे जिकरीचे बनले असून रस्त्यानजीकच्या लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे. या मार्गाची चाळण झाल्याने अनेक अपघात घडले आहे. तसेच दुचाकी, रिक्षा, अन्य वाहनांच्या वाहतुकीला धोकादायक मार्ग बनला आहे, असे पत्र ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामीण रस्ते विकास विभागाला देण्यात आले आहे.