इटानगर / वृत्तसंस्था
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अरुणाचल प्रदेशमधून बेपत्ता झालेल्या तरुणाला भारतीय लष्कराकडे सुपूर्द केले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी गुरुवारी ही माहिती दिली. अरुणाचल प्रदेशमधील अपर-सियांग जिह्यातील जिदो गावातील रहिवासी 19 वषीय मिरेम तारोन हा युवक नऊ दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. चीनच्या सैनिकांनी त्याचे अपहरण केले असल्याचा दावा स्थानिकांनी केला होता.
चीनच्या पीएलएने मिरोम तारोन या युवकाला भारतीय सैन्याकडे सुपूर्द केले आहे. आरोग्य तपासणी व इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदर युवकाला त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले. हा तरुण बेपत्ता झाल्यानंतर भारत आणि चीन एकमेकांच्या संपर्कात होते. यापूर्वी बुधवारीही भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱयांमध्ये हॉटलाईनवर चर्चा झाली. यावेळी चिनी सैन्याने सकारात्मक भूमिका घेत युवकाला भारताच्या ताब्यात देण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर या युवकाला भारतीय लष्कराकडे सोपवण्यासाठीचे ठिकाण निश्चित करण्यात आले.
अरुणाचलमधून चिनी सैन्याने भारतीय युवकाचे अपहरण केल्याचा आरोप झाल्यानंतर खळबळ उडाली होती. अरुणाचल प्रदेशमधील भाजप खासदारांसह विविध राजकीय पक्षांनी या युवकाची तातडीने सुटका करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती.