आठवी ते अकरावी या काळात वार्षिक परीक्षा जवळ आल्या की आधी सुट्टीचे वेध लागत. परीक्षेचा अभ्यास जो काय करायचा तो झालेला असे. आमची ‘टेक्निकल’ तुकडी असल्याने आम्हाला विज्ञान शाखेला महाविद्यालयीन प्रवेश नक्की ठरला होता. मेडिकलला जाता येणारच नव्हते. ज्याला विज्ञान शाखेला प्रवेश नक्की आहे त्याला कला शाखेला त्याहून लीलया मिळणार असल्याने टेन्शन नव्हते. वार्षिक परीक्षेत अपेक्षेनुसार मार्क मिळाले नाहीत तर बोलणी बसत. एखाद्याला घरी चोपले जाई. शाळेत दोन-तीन मारकुटे मास्तर असल्यामुळे घरच्या माराचे विशेष वाटत नसे.
परीक्षा संपल्या की आम्ही दोन उद्योग करायचो. आधी पाठय़पुस्तके जुन्या बाजारात विकणे. कारण परीक्षेत मार्क्स कितीही मिळोत, पास नक्की होणार हा आत्मविश्वास होता. पुस्तके विकली की त्या पैशांचा पालकांना हिशेब देताना घपला करून काही पैसे सिनेमे बघण्यासाठी, ‘साउंड ऑफ म्युझिक’ नावाच्या दुकानात गाणी ऐकण्यासाठी आणि इतर खर्चासाठी ठेवणे. त्याकाळी पॉकेटमनी नव्हता. वह्या फाडून त्यातली कोरी पाने काढून घेणे. मग वह्या रद्दीत विकणे. फाडलेली कोरी पाने बुक बाइंडरकडे देऊन रफ वह्या बनवून घेणे.
सायकल शिकण्यासाठी म्हणून एक-दोन आणे घेऊन शनिवारवाडय़ावर जाणे. तिघा-चौघा मित्रातला एखादाच मित्र सायकल घेई आणि त्यावर आम्ही थोडा थोडा वेळ खेळायचो. उरलेले पैसे गंगाजळीमध्ये जात. हे पैसे पालकांपासून लपवून ठेवणे हे एक दिव्य होते! पालक खिसे तपासत. दप्तरे तपासत. मी नववीत असताना घरातली जुनी रबरी बाहुली वापरली होती. बाहुलीचे मुंडके धडापासून वेगळे करून तिच्या नरडय़ातून आत पैसे असलेली पुडी टाकायची, मग पुन्हा मुंडके जोडायचे. ती बाहुली मी माझ्या दप्तरात जपून ठेवायचो. ‘काय हा कार्टा मुलींसारखा बाहुलीशी खेळतो’ म्हणून पालक सतत करवादत.
नववीत ‘श्रीकृष्ण वैद्य क्लासेस’ मध्ये इंग्रजी-गणित-विज्ञानसाठी जाऊ लागलो. गणिताच्या व्ही. एन. कुलकर्णी सरांनी गणिताविषयी खास प्रेम निर्माण केले. त्यामुळे नववी-दहावीनंतरच्या सुट्टीत पुढच्या वषीचे पुस्तक आणून मी रफ वहीत जवळपास सगळी समीकरणे-प्रमेये सोडवली होती. जून महिन्यात क्लासेस सुरू झाल्यावर उरलेली सरांना विचारली होती. तेव्हा सरांनी पाठीवर दिलेली थाप छान आनंददायी वाटली.