प्रतिनिधी/ वास्को
गोव्यातील तीन दिवसांच्या भेटीनंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू काल शनिवारी सकाळी दिल्लीला रवाना झाले. दाबोळी विमानतळावर त्यांना निरोप देण्यासाठी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्ले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, राज्य सचिव परिमल राय यांची उपस्थिती होती. उपराष्ट्रपती गोव्यातून दिल्लीला रवाना होण्याचा आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दिल्लीहून गोव्यात दाखल होण्याचा योगायोग एकाचवेळी जुळून आला.
दाबोळी विमानतळावर अतिमहनीय व्यक्तींची वर्दळ वाढली
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्याबरोबरच नुकतीच गृहमंत्री अमित शहा यांनीही गोव्याला भेट दिली होती. राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींचा अपवाद सोडल्यास, विधानसभा निवडणुकाजवळ आल्याने पूर्वतयारीसाठी आता केंद्रीय नेत्यांच्या गोवा भेटी वाढणार आहेत. आज रविवारी दुपारी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीलवाल यांचे गोव्यात आगमन होणार आहे. उद्या सोमवारी केंद्रीय जहाजोद्योग व भूपुष्ठ वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांचेही दोन दिवसांसाठी गोव्यात आगमन होणार आहे. केंद्रीय नेत्यांच्या येण्या जाण्यामुळे सध्या दाबोळी विमानतळावरही अतिमहनीय व्यक्तींची वर्दळ वाढलेली आहे. नेत्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांना निरोप देण्यासाठीही अतिमहनीय नेते आणि मान्यवर दाबोळी विमानतळावर जातीने हजर असतात. स्वागत जसे उत्साहाने करण्यात येते, त्याच उत्साहाने स्थानिक नेत्यांकडून केंद्रीय नेत्यांना निरोप देण्यात येत आहे. शनिवारी सकाळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे आगमन होण्यापूर्वी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी गोव्याचा निरोप घेतला.
पोलिसांवरही बराच ताण
केंद्रातील सत्ताधारी नेत्यांबरोबरच विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांचेही आगमन निवडणूक तयारीच्या दृष्टीने गोव्यात होत असून या साऱया अतिमहनीय नेत्यांच्या वर्दळीमुळे पोलिसांवरही बराच ताण येत आहे. रस्त्यांरस्त्यांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागतो. वाहतूक व्यवस्थाही चोख ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना सध्या बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत.