सर्वाधिक बोली लावल्याची चर्चा – मात्र निर्गुंतवणुकीला अद्याप मंजुरी न दिल्याचे सरकारचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची मालकी पुन्हा एकदा 68 वर्षांनंतर टाटा समूहाकडे जाणार असल्याची चर्चा सध्या देशभर सुरू आहे. ‘टाटा सन्स’ एअर इंडियासाठी टॉप बिडर म्हणून उदयास आली असून कंपनीने एअरलाईन लिलावासाठी सर्वाधिक बोली लावल्याचे वृत्त शुक्रवारी प्रसारमाध्यमांवर झळकले. मात्र, या वृत्तानंतर निर्गुंतवणुकीला अद्याप मंजुरी न दिल्याचे स्पष्टीकरण देत सरकारने यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तथापि, टाटा समूह लिलाव जिंकू शकतो, असे संकेत अधोरेखित झाल्यामुळे एअर इंडियाचे सारथ्य टाटांकडेच जाणार असल्याचे दिसत आहे.
तोटय़ात असलेल्या एअर इंडियाला विकण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी 2020 मध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू केली होती. त्याचबरोबर देशात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाला. यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडत गेली. यावषी एप्रिलमध्ये सरकारने इच्छुक कंपन्यांना एअर इंडिया खरेदी करण्यासाठी आर्थिक बोली लावण्यास सांगितले. यासाठी 15 सप्टेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. सरकारने यापूर्वी 2018 मध्ये एअर इंडियामधील 76 टक्के हिस्सा विकण्याची ऑफर दिली होती, परंतु ती यशस्वी झाली नाही. यानंतर, सरकारने कंपनीतील शंभर टक्के हिस्सा विकण्याची घोषणा केली. त्यानुसार टाटा सन्सने या प्रक्रियेत उडी घेतली होती.
समितीच्या बैठकीनंतर अधिकृत घोषणा
टाटा समूह शीर्ष बोलीदार म्हणून उदयास आला आहे, परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीनंतर पुढील आठवडय़ात अधिकृत घोषणा केली जाईल. एअर इंडियाच्या खासगीकरणावर स्थापन झालेल्या मंत्र्यांच्या समितीची बैठक येत्या काही दिवसांत होईल. विमान कंपन्यांसाठी विजयी बोलीवर समिती विचार करेल आणि मंजूर करेल. निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबर 2021 पर्यंत एअर इंडिया नवीन मालकाकडे सोपवण्याची सरकारची योजना आहे.
हवाई उड्डाण मंत्रालयाच्या सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या विक्रीसाठी दोन बोली लावण्यात आल्या होत्या. त्यात सरकारने टाटा समूहाची निवड केली आहे. टाटा समूह आणि स्पाइसजेट या दोघांनी एअर इंडिया विकत घेण्यासाठी बोली लावली होती. एअर इंडियासाठी मोठी बोली लावण्यात टाटांना यश आले आहे. मात्र या व्यवहाराची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. सरकारकडून यासंदर्भात अधिकृत माहिती जाहीर केल्यानंतर या व्यवहाराबद्दलचे चित्र स्पष्ट होणार आहे.
23,286.5 कोटी कर्जाचा भार
एअर इंडिया मागील अनेक वर्षांपासून सतत तोटय़ात आहे. 2007 मध्ये इंडियन एअरलाइन्सबरोबर झालेल्या विलीनीकरणानंतर एअर इंडियाने कधीही निव्वळ नफा नोंदवला नाही. एअर इंडियाला मार्च 2021 अखेर सरलेल्या तिमाहीमध्ये जवळपास 10,000 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे सांगण्यात येत होते. एअर इंडियावर 31 मार्च 2019 पर्यंत एकूण 60,074 कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र आता टाटा समूहाला यातील 23,286.5 कोटी रुपयांच्या कर्जाचा भार उचलावा लागणार आहे.