कल्लेहोळच्या शेतकऱ्यांनी रिंगरोड विरोधात नोंदविल्या हरकती
प्रतिनिधी / बेळगाव
रिंगरोड विरोधात कल्लेहोळ गावातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी आपल्या हरकती नोंदविल्या आहेत. जवळपास 10 हून अधिक शेतकऱ्यांनी या हरकती नोंदविल्या असून कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही, असे ठामपणे यावेळी त्यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात उपस्थित राहून त्यांनी आपला निर्णय सांगितला आहे. रिंगरोडसाठी तालुक्यातील 32 गावातील जमिनी घेण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना याबाबत नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यानंतर शेतकरी टप्प्याटप्प्याने आपले म्हणणे मांडत आहेत. बहुसंख्य गावातील शेतकऱ्यांनी या रिंगरोडला विरोध केला आहे. कल्लेहाळ गावातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांनी शुक्रवारी शिवबसवनगर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात जाऊन आपल्या हरकती नोंदविल्या आहेत. आम्ही अल्पभूधारक आहे. याचबरोबर आम्हाला इतर कोणताही व्यवसाय नाही. शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे आम्ही आमच्या जमिनी देवू शकत नाही, असे स्पष्ट सांगितले. शेतकऱ्यांच्यावतीने अॅड. शाम पाटील यांनी हरकती दाखल केल्या. यावेळी कल्लेहोळ गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
संघटितपणे लढणे महत्त्वाचे
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बेकायदेशीररित्या सर्व्हे करण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविक, शेतकऱ्यांनी विरोध केला असता सर्व्हे करणे हे चुकीचे आहे. मात्र हा रिंगरोड करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जोरदार प्रयत्न करत आहे. अनेक गावांमध्ये रिंगरोड सर्व्हे करण्यासाठी अधिकारी जात आहेत. तेव्हा शेतकऱ्यांनी संघटितपणे राहून याविरोधात लढा देणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.