सेनाधिकारी प्रशिक्षणासाठी एका वर्षात 43 जणांची निवड
अरुण आठल्ये/ रत्नागिरी
एका वेळेस 2 हजार सेनाधिकारी प्रशिक्षणार्थींना प्राथमिक शिक्षण-प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच ’एनडीए’ ही ख्यातनाम लष्करी अकादमी पुण्याजवळ खडकवासला येथे आहे. पण त्यात फारसा महाराष्ट्र दिसत नाही, असे म्हटले जाते. मात्र गेल्या 4-5 वर्षात हे चित्र पूर्णपणे बदलले असून एनडीएकडे मराठी तरुणांचा ओढा वाढू लागला आहे. 2020-21 या एका वर्षात तब्बल 43 मराठी युवकांची एनडीएत निवड झाली असून यात कोकणातील युवकांचाही समावेश आहे.
खडकवासला येथे 8 हजार एकर परिसरात वसलेली ही प्रबोधिनी भारताचे भूषण आहे. या ठिकाणी लष्कर, नौदल व वायुदलासाठी अधिकारी तयार केले जातात. दर 6 महिन्यांनी सुमारे 300 छात्र अखिल भारतीय स्पर्धा परीक्षेतून निवडले जातात. आपापली क्षमता व आवड यानुसार सेनादलाच्या एका शाळेतून प्रशिक्षण घेऊन तयार होणारे अधिकारी इथे परिपूर्ण होऊनच भारतमातेच्या सेवेत रुजू होतात.
एनडीएत प्रवेश केल्यानंतर पहिल्या पाच सत्रांमध्ये भूसेना, नौसेना व हवाई दलाचा इतिहास त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण परंपरा, लष्करी परंपरा, लष्करी तंत्रज्ञान, तिन्ही दलांशी संबंधित लष्करी सामग्री त्यांचे व्यवस्थापन, अधिकाऱयांशी चर्चा आदी बाबींची ओळख करून दिली जाते. एनडीएतून 3 वर्षांचे कठोर प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रशिक्षणार्थी सरळ लेफ्टनंट पदावर जातो. भारताचे आतापर्यंत झालेले जास्तीत-जास्त लष्करप्रमुख नौदलप्रमुख व हवाईदल प्रमुख हे एनडीएचे विद्यार्थी होते. यावरून एनडीएची महती आपल्याला लक्षात येईल.
एनडीए महाराष्ट्रामध्ये असूनही परप्रांतीय विद्यार्थ्यांचीच संख्या येथे परंपरेने अधिक राहिली आहे. परंतु त्यालाही ऐतिहासिक कारणे आहेत. ‘एनडीए’च्या उभारणीसाठी उत्तरेसह दक्षिणेतील अनेक प्रांत, राज्यांनी त्याकाळी (1945) प्रत्येकी 5 लाख रुपयांचा निधी दिला होता. त्यातील काही रक्कम आपापल्या भागातील पॅडेटच्या प्रशिक्षणासाठी देण्यात आली होती. त्याच्याच जोरावर महाराष्ट्रेतर राज्यांचे एनडीएशी नाते जोडले गेले आहे.
एनडीएत निवड झालेले मराठी तरुण
अनीश कुलकर्णी, विनायक ओरपे, अनुराग शिंदोलकर, प्रथमेश हास्ते, सोमया पाटील, हृषिकेश बारापात्रे, अजिंक्य बोरकर, किरण पाटील, यश देशमुख, वेदांत आकेरकर, जयंत रायकर, शिवराज मोरे, जयंत जाधव, उदित जोशी, अनुराग देव, पार्थ दवळे, मंगेश चव्हाण, अनिरुद्ध बर्डे, सिद्धांत गायकवाड, साहिल दिक्षित, अथर्व ओझर्डे, समर्थ कुलकर्णी, शार्दूल तांगुडे, अथर्व जाधव, व्यंकटेश गांगुर्डे, संजय पाटील, रोहित भोरे, यश अडसूळ, आकाश ठाकूर, तन्मय देशमुख, सुमीत कदम, दविद राणे, प्रथम ढोले, श्रीराम क्षीरसागर, निसर्ग सुर्वे, प्रवीण साळवी, पवन पाटील, देवांश जोशी, सोहम नातू, मयुरेश पाटील, कार्तिकेय वेर्णेकर, रवी माने, अथर्व बनकर, या मराठी तरुणांनी एनडीएमध्ये आपले पाय भक्कमपणे रोवले आहेत.
महाराष्ट्राचा टक्का वाढला
उत्तरप्रदेशमधून येणाऱया तरुणांचे प्रमाण 20 टक्के, हरियाणातून 10 टक्के तर महाराष्ट्रातील तरुणांच्या भरतीचे प्रमाण केवळ 7 टक्के होते. नजीकच्या काळात ते वाढून आता 10 टक्के झाले आहे.