वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
23 जुलैपासून सुरू होणाऱया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला जाणाऱया भारतीय पथकातील तीन ऍथलिटस्ना तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण करण्याचा आदेश अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने दिला आहे.
भारताची महिला धावपटू भावना जाटने शुक्रवारी आपली तंदुरुस्ती चाचणी दिली. तसेच ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारे भारताचे दोन ऍथलिटस् के. टी. इरफान आणि एम. श्रीशंकर यांना येत्या दोन दिवसामध्ये तंदुरुस्ती चाचणी देण्याचा आदेश दिला आहे. भावना आणि इरफान हे 20 कि.मी. पल्ल्याच्या चालण्याच्या शर्यतीत भारताचे प्रतिनिधीत्व करतील. श्रीशंकर लांब उडीत सहभागी होत आहे. भारताचे हे तीन ऍथलिटस् सध्या बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये सराव करीत आहेत. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले ऍथलिटस् तंदुरुस्त आणि दुखापतीविना असणे जरुरीचे आहे. जपानमध्ये 2019 च्या मार्च महिन्यात झालेल्या आशियाई रेस वॉकिंग स्पर्धेत ऑलिम्पिकसाठी इरफानने आपली पात्रता सिद्ध केली. रांचीमध्ये गेल्या मार्चमध्ये झालेल्या राष्ट्रीय रेस वॉकिंग स्पर्धेत त्याने आपला सहभाग दर्शविला होता. मे महिन्यामध्ये इरफानला कोरोनाची बाधा झाली होती पण तो या व्याधीतून पूर्ण बरा झाला आहे. 2020 साली झालेल्या राष्ट्रीय रेस वॉकिंग स्पर्धेत भारताची महिला धावपटू भावना जाटने टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले होते. टोकियो ऑलिम्पिकसाठी अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने 26 जणांचा संघ निवडला आहे. चालू महिन्याच्या अखेरीस भारतीय चमू टोकियोला प्रयाण करणार आहे.