संगीत आणि साहित्य या दोन्ही विषयांची आवड असणाऱया व्यक्तीला जर विचारलं की तुम्हाला कविता जास्त आवडेल की गाणं? तर चतुर व्यक्ती हे उत्तर देईल की ‘गाणं’. आणि त्याचं कारणही सरळ आहे. प्रत्येक गाण्यात एक कविता असतेच. अपवाद फक्त तराण्याचा! त्यातही तबल्याच्या बोलांचे तुकडे असतात. नोम तोम तनन देरेना सारखी धृपदाची अंगंही असतात. आणि यलली यलली सारखे वरकरणी निरर्थक वाटणारे शब्दही सूफी संतांना तुर्यका अवस्थेत असताना सुचलेले आनंदोद्गार आहेत अशी माहिती मिळते. अर्थातच तेही शब्द अर्थहीन नाहीतच. फक्त ज्याप्रमाणे आपल्याला माहीत किंवा अवगत नसलेल्या भाषेतले शब्द ऐकू येत नाहीत आणि त्यांचे अर्थ कळत नाहीत तसेच त्या शब्दांचे अर्थ आपल्याला गवसलेले नसतात. याचाच अर्थ असा होतो की प्रत्येक गाण्यात एक कविता असतेच असते. अगदी भारतीय अभिजात संगीताचा मूलाधार असलेल्या धृपदातही ईश्वराची स्तुती करणारी कविता रचून वापरलेली असते. उदाहरणार्थ
पारब्रह्म परमेश्वर पुरुषोत्तम परमानंद
नंदनंदन आनंदकंद यशोदानंद श्रीगोविंद
हेच शब्द घेऊ. आता गाणं होण्यास योग्य असलेल्या कवितेला मूळ अट ही असते, की यमक जुळलं पाहिजे. तर धृपदाच्या या अस्ताईकडे पाहिलं तर परमानंद आणि श्रीगोविंद हे शेवटचे शब्द ती अट परफेक्ट पुरी करतात. याशिवाय या कवितेचं दुसरं वैशिष्टय़ म्हणजे तिच्यात अनुप्रास अलंकाराचा मुक्त वापर आहे. ‘प’ हा वर्ण आणि मग ‘न’ आणि अनुस्वारयुक्त रचना नादमाधुर्य निर्माण करते. जे पखवाजसारख्या घनगंभीर तालवाद्यासोबत साजून दिसतं. अशा कितीतरी रचना अगदी तानसेनाच्या काळापासून ते आजपर्यंत केल्या गेल्या आहेत. धृपदासाठी लावलेला नुसता षड्जही इतका दमदार असतो की माणसं सावरून बसतात. मग इतक्मया राजेशाही गानप्रकारामध्ये कविताही तितकीच श्रीमंत असली पाहिजे. नाहीतर स्वरांनी निर्माण केलेली पार्श्वभूमी शब्दांनी भंगून जायची! असं नाही चालत. गाण्यातल्या कवितेचं हे असं मंगलाचरण! ‘ख्याल’ या विषयातल्या कवितेवर तर किती लिहावं तितकं कमी आहे. ऐकता ऐकता ल?क्ष गेलंच पाहिजे आणि सुरांच्या बरोबरीने शब्दांचा आनंद दरवळत आलाच पाहिजे अशी असंख्य स्वरपुष्पं त्यात आहेत.
अगदी बिभासमधल्या ‘हे।़।़ नरहर नारायण’ सारख्या देवस्तुतीपासून ते भूपातल्या ‘सहेला रे।़’ सारख्या प्रेमगीतापर्यंत विविधता त्यात आढळते. झपतालासारख्या, आनंदलहरीवर झुलवत ठेवणाऱया पण गाण्याच्या दृष्टीने पाटीलछाप कठीण असणाऱया तालात बद्ध असणाऱया चिजांमध्ये काही नुसतेच ठोकळेबाज शब्द नसतात. म्हणजे गाण्यातल्या कवितेची अतिमहत्त्वाची दुसरी अट म्हणजे ती छंदोबद्ध असली पाहिजे. मुक्तछंदाचं गीत होऊ शकत नाही. कविता जेव्हा यमकामध्ये असते, शिवाय ती छंदोबद्ध असते, तिच्या प्रत्येक ओळीला जेव्हा विशिष्ट लय असते तेव्हाच ती गाण्यात राहू शकते. यादृष्टीने शास्त्रीय संगीतातल्या कवितांचं म्हणजेच चिजा, बंदिशींचं आणखी एक मोठ्ठं वैशिष्टय़ म्हणजे त्या रचनांचं अल्पाक्षरित्व! स्वरांतूनच मुख्यत्वेकरून संवाद साधायचा असल्यामुळे असेल पण बंदिश ही तुलनेने छोटी असते.
गाण्याच्या प्रकारांनुसार कवितेचाही आकार, बाज बदलत जातो. शास्त्रीय गायकीत छोटं असणारं हे कवितेचं गाणं उपशास्त्रीय संगीत आणि भावसंगीत असा प्रवास करत आकार, आशय आणि स्वरूप अशा सर्वच पातळय़ांवर त्या त्या प्रमाणात बदलत जातं. भावसंगीत ही मूलतः शब्दप्रधान गायकी आहे. त्यामुळे त्यात कवितेचं? पारडं गाण्याच्या बरोबरीने जड होतं. कधीतरी तर जास्तच. त्यासाठी रीतसर ध्रुवपद आणि एकापेक्षा जास्त कडवी अशी रचना असते. कधी कल्पक संगीतकार चांगल्या चांगल्या रचनांच्या शोधात असतो तर कधी कधी गाण्याची चाल आधी बनते आणि मग त्यासाठी योग्य शब्दांची जोड जुळवली जाते. इथे गाण्यापाठी दडलेली कविता अचानक सामोरी येते. ती चालच पुरेशी बोलकी असते. गजलसारखा विषय तर एवढा चॅलेंजिंग असतो की उत्तम घोटीव, शिवाय नैसर्गिकरीत्या तालबद्ध रचना तितक्मयाच ताकदवान स्वरांशी जुळून यावी लागते. शास्त्रीय व भावसंगीत यांच्या सीमारेषेवरचा हा प्रकार जमला तर अतिउत्तम आणि नाही जुळला तर थेट इस्कोट असा असतो. पण शेवटी एकच. भावगीत, गजल, नाटय़गीत, पोवाडा, लावणी, अभंग यातलं काहीही असो. एक सशक्त कविता यातल्या प्रत्येक गानप्रकारापाठी उभी असावी लागते.
खुद्द कवितेचं मात्र असं काही नसतं. कवितेसाठी गाणं ही काही आवश्यक अट नसते. ती जशी वृत्तबद्ध तशीच वृत्तहीन असू शकते. छंदबद्ध त्याचप्रमाणे मुक्तछंदातही असते. स्वर नसले तरीही प्रत्येक कवितेला स्वतःची अशी एक लय असते. सुरेश भटांच्या कितीतरी सुंदर कविता अशा होत्या की त्यांच्यामध्ये दडलेली गाणी पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या अत्युच्च प्रतिभावंत आणि प्रयोगशील संगीतकाराला भावली आणि ती गाणी अजरामर झाली. काही कविता या रूढ चाकोरीतली गाणी होत नाहीत. त्या धुनेसारख्या असतात. त्यांची चाल कवीच्या मनात असते. उदाहरणार्थ बोरकरांच्या ‘तुजी गो पैंजणा’ किंवा ‘बांगडय़ा बघा या’ सारखी कविता ते स्वतःच गाऊन सादर
करीत.
खरंतर तीच चाल सर्वात गोड वाटते. पाडगावकरांच्या बोलगाण्यांना अशीच सोपी चाल छान वाटते. त्या कवितांचं एक्स्प्रेशनच वेगळं. तशीच संदीप खरेची काही गाणी. कवी आणि गीतकार यातली सीमारेषा पडते ती इथे. कवितेसाठी उत्स्फूर्तपणे कविता म्हणणारा तो कवी आणि गाणं होण्यासाठीच, प्रसंगी ठरवूनही कविता रचणारा तो गीतकार! गीतकारापेक्षा कवी असणं जास्त प्रति÷sचं मानलं जात असे ते कदाचित यामुळेच असेल. बंदिशी, चिजा यांचे रचनाकार मात्र ‘वाग्गेयकार’ म्हणून गौरविले जातात. कारण जो कवी तोच अपरिहार्यपणे संगीतकार असतो. उत्तम काव्यरचना आणि तितकीच समर्पक रागवाचक चाल हे म्हणजे शिवधनुष्य असतं. पण सदारंग अदारंग यासारख्या पूर्वसूरींपासून ते आजच्या कलाकारांपर्यंत असे अनेक वाग्गेयकार होऊन गेले आणि होत
राहतील.
कवितेला गाणं असण्याचं बंधन नसतं. गाण्यात मात्र कविता असावीच लागते. बहुश: कवितेशिवायचं गाणं अपूर्णच म्हणावं लागेल. तेव्हा आपल्या जिवावर गाण्याचं अख्खं क्षेत्र उभं आहे असं कविलोकांनी म्हटलंच तर ते वावगं नक्कीच म्हणता येणार नाही. परंतु यामुळेच साहित्य व संगीत या दोहोंची आवड असणाऱया मंडळींचा ओढा मात्र स्वाभाविकच गाण्याकडे जास्त राहील कारण कविता गाण्याबरोबरच येऊन विनासायास कडकडून भेटते म्हणून!
अपर्णा परांजपे-प्रभु