पत्रकार परिषदेत अरुणसिंग यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
प्रतिनिधी / बेळगाव
काँग्रेसची वाटचाल ही विनाशाकडे चालली आहे. या पक्षाला कोणतीही भारतीय संस्कृती नाही. नेतृत्व शून्य हा पक्ष झाला आहे. केवळ षङयंत्र करून भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न काँगेसने केला आहे. असे असले तरी देशातील जनता ही शहाणी असल्यामुळे सर्वच राज्यांमध्ये भाजपचे सरकार येणार आहे. बेळगाव पोटनिवडणुकीमध्ये भाजपच विजयी होणार, असा ठाम विश्वास भाजपचे राष्ट्रीय जनरल सेपेटरी आणि कर्नाटक राज्याचे निवडणूक प्रभारी अरुणसिंग यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, पॉडीचेरी, तामिळनाडू या सर्व राज्यांत भाजप सत्तेवर असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस विनाशेच्या दिशेने चालला आहे. त्यामुळे आम्हाला कोणतीच भीती नाही, असे त्यांनी सांगितले. दिवंगत केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री सुरेश अंगडी यांनी बेळगावला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी मोठी भूमिका बजावली आहे. बेळगावचे एअरपोर्टही बनविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. एक सभ्य व सुसंस्कृत व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे निश्चितच त्यांच्या पत्नी मंगला या विजयी होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
सध्या जे शेतकरी आंदोलन करत आहेत ते काँग्रेसचे एजंट असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. यावेळी पत्रकारांनी ईश्वराप्पा यांनी केलेल्या तक्रारीबाबत विचारले असता त्यांनी थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेली. याचबरोबर बसवराज यत्नाळ यांनी अनेकवेळा पक्षाच्या विरोधात भाष्य केले आहे. त्याबाबतही पत्रकारांनी विचारले. त्यावर त्यांना नोटीस देण्यात आली असून योग्य वेळ येताच त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले. महागाईबाबत विचारले असता काँग्रेसपेक्षा महागाई कमी आहे असे सांगितले. मात्र पत्रकारांनी भाजपनेच सर्वात जास्त महागाई केल्याचा आरोप केला. यावर सारवासरव करण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांनी केला. यावेळी त्यांच्या सोबत खासदार इराण्णा कडाडी, मंत्री उमेश कत्ती, श्रीमंत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, आमदार अनिल बेनके यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी हणमंत केंगाली यांनी स्वागत केले तर शरद पाटील यांनी आभार मानले.