आमदार पी एन पाटील यांच्या प्रश्नावर मृद व जलसंधारण मंत्र्यांचे आश्वासन
सांगरूळ / वार्ताहर
काटेभोगाव (ता. पन्हाळा ) येथील पाझर तलावाच्या अश्मपटलाचे ( दगडी पिचिंगचे )काम नव्याने करून घेण्यात येणार आहे. अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी विधिमंडळ अधिवेशनात दिली .करवीर विधानसभा मतदार संघाचे आमदार पी एन पाटील यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मौजे काटेभोगाव गावापासून नदीचे पात्र दूर अंतरावर आहे.यामुळे सिंचना अभावी सर्वाधिक कोरडवाहू शेती आहे.पावसाळा संपल्यानंतर रब्बी पिके व जनावरांना पाण्याची सोय असावी म्हणून १९७२ मध्ये रोजगार हमी योजनेतून गावाच्या दक्षिणेला पाझर तलाव बांधण्यात आला होता. पण या पाझर तलावाला मोठी गळती असल्याने त्याच्यात पाणीसाठवण होत नव्हती. हा तलाव मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग केल्याने डागडुजीसाठी ५६ लाख ६७ हजार निधी मंजूर करण्यात आला.
यानंतर भरावा वरील झाडे काढून साफसफाई करण्यात आली व पाया खुदाई करून कामाला सुरुवात करण्यात आली होती. तलावाच्या अश्मपटलाचे काम प्रगतीपथावर असतानाच जून महिन्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे अश्मपटलाचे दगड व मुरूम तलावात घसरुन गेला होता .यामुळे तलावास धोका निर्माण झाला होता . तलावाच्या खाली असणारी शेकडो एकर शेती धोक्यात आली होती . यावेळी तलावाच्या निकृष्ट कामाबाबत वर्तमानपत्रातून ही आवाज उठवला गेला होता. याबाबत आमदार पी एन पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारून सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
विधिमंडळात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी का काटेभोगाव पाझर तलावाच्या प्रश्नाबाबत खुलासा करताना दिनांक ३ . ६ . २०२० रोजी अश्मपाटलाचे काम प्रगतिपथावर असताना चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे अचानक तलाव क्षेत्रावर अतिवृष्टी झाली. त्यामुळे प्रगतीवर असलेले अश्मपटल व मुरूम पाण्यामध्ये खाली घसरला आहे. यामूळे शासनाच्या निधीचा कोणताही अपव्यय झालेला नसून अचानक आलेल्या चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे सदर घटना घडली आहे. सद्यस्थितीत धरणात पाणीसाठा पूर्ण क्षमतेने झाल्यामुळे काम थांबलेले आहे.
तसेच निविदेमधील काम अद्याप पूर्ण झालेले नाही .त्यामुळे तलावातील पाणी पातळी कमी झाल्यावर तलावांमध्ये घसरलेला मुरूम व दगड काढून नव्याने अश्मपटलाचे (दगडी पिचिंगचे ) काम चांगल्या प्रकारे करून घेण्यात येणार असल्याची माहिती सभागृहाला दिली. आमदार पी एन पाटील यांनी पाझर तलाव बाबत विधिमंडळात आवाज उठवल्याने जलसंधारण मंत्र्यानी तलावाच्या दुरुस्तीच्या बाबत दिलेल्याआश्वासनामुळे काटेभोगावच्या शेकडो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.