मतदारसंघाच्या सकारात्मक विकासासाठी रिंगणात, अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम
प्रतिनिधी /कुंकळ्ळी
कुंकळ्ळी मतदारसंघातून बाळ्ळीचे उद्योजक संतोष शिवा फळदेसाई हे यावेळी निवडणूक लढविणार असून त्यांनी आपले निवडणूक कार्यालयही कुंकळ्ळीत सुरू केले आहे. बुधवारी सकाळी या कार्यालयाचे उद्घाटन भिंवसा येथील रहिवासी व निवृत्त पोलीस उपअधीक्षक टोनी फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. प्रकाश प्रभुदेसाई, दिनेश पावस्कर, शाबा देसाई, रवींद्र फळदेसाई त्याचबरोबर समाधान मारूती देसाई, महेश देसाई, पंकज चितारी, संदीप पुनाजी देसाई, समीर च्यारी, संदेश पेंकरे, नभेश च्यारी, कुलदीप प्रभुगावकर, रोहित च्यारी आणि फळदेसाई यांचे इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
फळदेसाई यांना निवडून येण्याची संधी असून यावेळी त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन फर्नांडिस यांनी या कार्यक्रमात बोलताना केले. फळदेसाई हे एक चांगले कार्यकर्ते आहेत. विविध घटकांना ते मदतही करत असतात. नेहमी त्यांचा हात मदतीसाठी पुढे असतो, असे ते म्हणाले. फळदेसाई यांनी निवडून आल्यानंतर सरकार स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला पाठिंबा द्यावा, पण कायमचे पक्षात जाऊ नये. त्यांनी मंत्रिपद मिळवावे व कुंकळ्ळीचा विकास करण्यासाठी झटावे, असा सल्ला फर्नांडिस यांनी दिला. त्यांनी फळदेसाई यांना पूर्ण सहकार्य करण्याची यावेळी तयारी दाखविली.
फळदेसाई यांनी कुंकळ्ळीचा सकारात्मक विकास करण्यासाठी या निवडणुकीत उतरत असल्याचे स्पष्ट केले. आपले अनेक समर्थक व अन्य नागरिकांनी यासाठी आग्रह केल्याचे त्यांनी सांगितले. मागील आमदारांना कुंकळ्ळीचा हवा तेवढा विकास साधता न आल्याचा टोला फळदेसाई यांनी लगावला. मतदार आपल्या मागे असून जिंकून येण्याची पूर्ण खात्री आपणास आहे. लोकांवर आपला पूर्ण विश्वास आहे, असे ते म्हणाले.
समर्थक, अन्य नागरिकांनी आग्रह केला
आपल्याला निवडणूक लढविण्यात रस नव्हता. पण बाळ्ळी पंचायत कुंकळ्ळी मतदारसंघात समाविष्ट झाल्यामुळे या मतदारसंघात काम करण्याची आपल्याला संधी मिळाली. सुरुवातीला बाळ्ळी पंचायतीत सरपंचांना निवडून आणले. आंबावली पंचायत पोटनिवडणुकीत दोन सदस्य निवडून आणले तसेच चांदर पंचायत, गिरदोली पंचायत, माकाझन पंचायत येथेही नागरिकांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे आपले कार्य चालूच ठेवले. निवडणूक लढवू नका असे कुणीही सांगितले नाही, उलट आग्रह केला, असे फळदेसाई यांनी निवडणूक लढविण्यामागील कारण स्पष्ट करताना सांगितले.
याआधी आपण भाजपसाठी झटलो, पण भाजपने प्रतिसाद दिला नाही. आपले समर्थक व इतरांनी आपण निवडणूक लढवावी यासाठी आग्रह केला. आपल्याशी आतापर्यंत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस यानी संपर्क साधला. पण आपणास कोणत्याही पक्षात जायचे नाही व अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणूक लढविण्याचा ठाम निर्धार आपण केला आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले. सूत्रसंचालन राहुल उल्हास देसाई यांनी केले आणि त्यांनीच आभार मानले.