वार्ताहर/ कुद्रेमनी
कुद्रेमनी परिसरात मंगळवारी दुपारी मोठा पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. ऐन सुगीच्या हंगामात पडलेल्या पावसामुळे शेतीची कामे खोळंबली असून नुकसानीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
रताळी काढणी, भात कापणीची कामे ऐन भरात आहेत. कापलेली माळरानातील भात पीक भिजून गेली. काही ठिकाणी मळण्या काढण्याची कामं अर्धवट झाली आहेत. शिवारातील शेतवडीतील बहरून आलेले भात शिवाराताच आडवी पडून गेली आहेत. शिवारात पुन्हा पाणी झाले. त्यामुळे भातकापणीसाठी व मळणी कामासाठी नुकसानीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दसरा सणाच्या निमित्ताने रताळय़ाला भाव मिळेल या आशेने शेतकऱयांनी रताळी काढण्याची कामे जोरात सुरू आहेत. पावसामुळे शेतवडीतील रस्ते पाणी व चिखलमय झालेले असून बैलगाडय़ा, ट्रक्टर, टम्पो अनेक ठिकाणी अडकून पडण्याचे प्रकार घडले. रताळी व रताळय़ाचे वेल भरलेल्या गाडय़ा शेतातच सोडून येण्याचे प्रसंग काही शेतकऱयांवर आल्याचे प्रकारही आज घडले. मंगळवारी सकाळी हवामानात दमट व वातावरणात उष्णता निर्माण झाली होती व दुपारी पाऊस झाला. गावातील गटारी रस्ते तुडूंब भरून वाहत होते. हा पाऊस तुर्केवाडी, ढेकोळी, तडशिनहाळ या भागात मोठय़ा प्रमाणात झाला. छोटय़ा मोठय़ा ओढे नाल्यांना पुन्हा पाणी आले त्यामुळे वाटा बंद झाल्या.
या भागात सध्या ऊस तोडणीची चाहुल सुरू झाली आहे. मोठय़ा पावसामुळे उसाची उसाची वाहतूक करणे ही अवघड बाब ठरलेली आहे. पावसामुळे सध्या नुकसानीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.