नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून निवासस्थानाबाहेरच्या बॅरिकेड्सची मोडतोड केली, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपने केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचल्याचाही आरोप केला आहे.
भाजपने मात्र या आरोपांना नाकारले असून केजरीवाल यांच्या घरावर भाजपच्या युवा शाखेच्या कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण मोर्चा काढला होता, असे प्रतिपादन केले आहे. कार्यकर्त्यांनी कोणतीही मोडतोड पेलेली नाही. ती काही अज्ञात असामाजिक व्यक्तींकडून झालेली असू शकते, असे भाजपचे म्हणणे आहे.
केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत बोलताना ‘द काश्मीर फाईल्स’ या सध्या गाजत असणाऱया चित्रपटाची खिल्ली उडविली होती. तसेच भाजपवरही तोंडसुख घेतले होते. यासाठी त्यांना सोशल मिडीयामध्ये त्यांच्यावर असंख्य लोकांनी टीकेचा भडीमार केला होता. तसेच अनेक मीम्सही पोस्ट करण्यात आले होते. केजरीवाल यांनी आपल्याच देशात विस्थापित व्हावे लागलेल्या काश्मीरी पंडितांची चेष्टा केल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्या निवासस्थानावर त्यांचा निषेध करण्यासाठी मोर्चा नेण्यात आला होता. यासाठी जर आम्हाला असामाजिक तत्वे म्हणून मानण्यात येत असेल तर तो आरोप आम्ही स्वीकारतो, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते तेजिंदर पालसिंग बग्गा यांनी केला. भाजयुमोच्या या मोर्चात 500 हून अधिक कार्यकर्ते होते.
बॉक्स
काश्मीर फाईल्सची वाटचाल 275 कोटींकडे काश्मीरी पंडितांवर दहशतवाद्यांनी केलेल्या अत्याचाराचे चित्रण असलेल्या काश्मीर फाईल्स या चित्रपटाची दमदार वाटचाल सुरु आहे. आतातर्यंत या चित्रपटाने 260 कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून त्याची वाटचाल 250 कोटी रुपयांकडे सुरु आहे. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला होता. त्यामुळे त्याची उलाढाल काही प्रमाणात घटली. अन्यथा त्याने आतापर्यंत 300 कोटीचा टप्पा गाठला असता, अशी प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे.