पशुसंवर्धन खात्यात 32 पदांसाठी कोकणीची अट शिथील : गोवा फॉरवर्डची संतप्त प्रतिक्रिया
प्रतिनिधी / पणजी
सरकारी नोकरीसाठी कोकणी सक्तीची अट शिथील करणे म्हणजे कोकणी भाषेच्या अस्तित्वासह गोमंतकीयत्वावरच घाला घालण्यासारखा प्रकार आहे, अशी जोरदार टीका गोवा फॉरवर्ड पक्षाने केली आहे. याप्रश्नी युवकांनी एकत्र येऊन सरकारविरोधात लढा द्यावा, असे आवाहन पक्षाने केले आहे. तसेच प्रसंगी न्यायालयात याचिकाही दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पणजीत पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत फॉरवर्डच्या ऍम्प्लॉई फॉरवर्डचे निमंत्रक जॉन नाझारेथ बोलत होते. या सर्व प्रकारामागे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेच सुत्रधार आहेत. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गमधील लोकांसाठी गोव्यात गालिचे अंथरून स्वागत करण्याचे वक्तव्य केले होते, त्यावर आम्ही प्रकाश टाकला होता. आता त्याच मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा त्या लोकांसाठी सरकारी नोकऱयांचे दरवाजे खुले केले आहेत. त्यासाठीच या नोकऱयांच्या मार्गातील प्रमुख अडचण ठरणारी कोकणीची अट त्यांनी काढून टाकली आहे, असा दावा नाझारेथ यांनी केला.
सरकारच्या विविध खात्यात सुमारे 44 पदांसाठी नुकतीच गोवा लोकसेवा आयोगातर्फे वृत्तपत्रीय जाहिरात देण्यात आली आहे. त्यातील तब्बल 32 पदे (पशुवैद्यक) ही एकटय़ा पशुसंवर्धन खात्यात भरायची असून त्या सर्व पदांसाठी कोकणी सक्तीची अट शिथील करण्यात आली आहे. कोकणीचे ज्ञान असलेला उमेदवार न सापडल्यास बिगर कोकणी उमेदवाराची निवड करण्यात येईल, असे जाहिरातीत म्हटले आहे. त्या पदांसाठी मराठी सक्तीची अट मात्र कायम ठेवण्यात आली असून त्यावरून ही पदे सावंतवाडीतील लोकांना द्यायचे सरकारने नक्की केले आहे, हेच सिद्ध होते, असे ते म्हणाले.
गोवा कला महाविद्यालयात प्राचार्यपदी एका बिगरगोमंतकीय महिलेची नियुक्ती करण्यासाठी अशाच प्रकारे कोकणीची अट शिथील करण्यात आली होती. सदर पदी नियुक्तीसाठी स्वातंत्र्यसैनिकाचा सुपूत्र असलेला गोमंतकीय युवक पात्र असतानाही त्याला डावलून मुंबईतील महिलेची वर्णी लावण्यात आली होती याची श्री. नाझारेथ यांनी आठवण करून दिली. यावरून हे सरकार गोवा आणि गोमंतकीयांच्या मुळावरच उठले आहे, हेच स्पष्ट होते. कोकणी ही गोव्याची अस्मिता आहे. तिला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी शेकडो गोमंतकीयांनी योगदान, बलिदान दिले होते. अशावेळी विद्यमान सरकार या सर्व गोमंतकीयांचा अपमान करून महाराष्ट्राचे लांगूलचालन करण्यात धन्यता मानू लागले आहे, अशी टीका नाझारेथ यांनी केली.