प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना आणि लॉकडाऊन काळात सावकारी व्यवसायाला पुन्हा ऊत आला आहे. ग्रामीण भागामध्ये अडचणीत असलेले गरीब कुटुंबीय सावकारांकडून पैसे घेत आहेत. चैनीखातर काही तरुणही या सावकारांकडून रक्कम उचलत आहेत. ती रक्कम दिली नाही तर चारपटीने व्याज आकारणी करून वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. सावकारी व्यवसाय करणे हा गुन्हा असला तरी ग्रामीण भागात प्रत्येक गावामध्ये हा सावकारी व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात असून या व्यवसायाविरोधात पोलिसांनी कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनामुळे कामधंदा नाही, नोकरी नाही, जीवन जगण्यासाठी कोणताच आधार नाही. आजारपण आल्यानंतर दवाखान्याला पैसे नाहीत. त्यामुळे मासिक दहा ते पंधरा टक्के व्याजाने रक्कम दिली जात आहे. व्याज दिले नाही तर दमदाटी केली जात आहे. यापूर्वी अशा प्रकारांमुळे अनेकांनी आपले जीवन संपविले होते. काही कुटुंबे घरे सोडून गेली आहेत. यामुळे कोरोना काळात तरी पोलिसांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. सध्या साऱयांवरच उपासमारीची वेळ आली आहे. कोणताच व्यवसाय नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. आजारपण आले तरी उपचारासाठी पैसा नाही. त्यामुळे नाईलाजास्तव ही रक्कम दहा टक्क्मयाने घ्यावी लागत आहे. काही अतिउत्साही आणि चैनीबाज तरुण पैसे घेऊन चैनी करत आहेत. त्यानंतर ते चांगलेच अडचणीत येत आहेत. तेव्हा अशाप्रकारे व्याजाने पैसे देणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.